मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:54 IST2026-04-28T13:51:03+5:302026-04-28T13:54:08+5:30
Mumbai Vande Bharat Train 20 Coach Train: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता या ट्रेनला तात्पुरते २० कोच जोडले गेले होते. परंतु, या वंदे भारत ट्रेनला २० कोच कायमस्वरुपी करण्यात आले आहेत.

मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार?
Mumbai Vande Bharat Train 20 Coach Train: आताच्या घडीला वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेची सर्वाधिक लोकप्रिय ट्रेन आहे. वंदे भारत चेअर कार, वंदे भारत स्लीपर, वंदे भारत मेट्रो यांचा विस्तार भारतीय रेल्वे करत आहे. वंदे भारत चेअर कार ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक वंदे भारत ट्रेनचे कोच वाढवण्यात आले आहेत. प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर एका वंदे भारत ट्रेनच्या कोचची संख्या १६ वरून २० करण्यात आली होती, ती २० कोचची संख्या आता कायमस्वरुपी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
आताच्या घडीला मुंबई - मडगाव (गोवा) वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई - साईनगर शिर्डी, मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई - जालना/नांदेड वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल (गुजरात) वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई - अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस या वंदे भारत ट्रेन मुंबईतून सुटतात. यापैकी मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ट्रेनच्या २० कोचची संख्या कायमस्वरुपी करण्यात आली आहे.
या वंदे भारत ट्रेनला होते १६ डबे
मुंबई-अहमदाबाद ही देशातील ४२ वी वंदे भारत ट्रेन असल्याचे म्हटले जात आहे. या सेमी-हाय-स्पीड ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ मार्च २०२४ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. या वंदे भारत ट्रेनची देखभाल आणि संचालन पश्चिम रेल्वे विभागामार्फत केले जाते. ट्रेन क्रमांक २२९६२/२२९६१ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत ट्रेन १३ मार्च २०२४ रोजी नियमितपणे सुरू करण्यात आली होती, तेव्हा तिला १६ डबे होते.
तीन चेअर कार डबे आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास
जानेवारी २०२६ मध्ये वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी चार डबे जोडण्यात आले, ज्यामुळे डब्यांची एकूण संख्या तात्पुरती २० झाली. ही २० डब्यांची व्यवस्था मार्च आणि एप्रिलमध्येही सुरू राहिली. या चार एसी चेअर कार डब्यांच्या वाढीमुळे ट्रेनच्या एकूण प्रवासी क्षमतेत २७८ प्रवाशांची वाढ झाली. ट्रेन क्रमांक २२९६१/२२९६२ वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये १६ वरून २० डब्यांपर्यंत केलेली तात्पुरती वाढ करण्यात आली होती. ती आता २८ एप्रिल २०२६ रोजी पासून कायमस्वरूपी करण्यात येईल. या वाढीव चार कोचमध्ये तीन चेअर कार डबे आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास कोचचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ४९१ किमी अंतर ५ तास ४० मिनिटांत पार करते. ही ट्रेन रविवार वगळता आठवड्याच्या सर्व दिवशी धावते. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल दरम्यानच्या प्रवासादरम्यान वडोदरा, सुरत, वापी आणि बोरावली या चार रेल्वे स्थानकांवर थांबते.