चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 08:48 IST2026-04-16T08:46:50+5:302026-04-16T08:48:12+5:30
Maharashtra Weather Update: वाढत्या उष्णतेमुळे मार्चपेक्षा एप्रिल तापदायक ठरत असून, अकोला येथे बुधवारी तब्बल ४४.२ अंश इतके तापमान नोंदविण्यात आले. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
मुंबई - वाढत्या उष्णतेमुळे मार्चपेक्षा एप्रिल तापदायक ठरत असून, अकोला येथे बुधवारी तब्बल ४४.२ अंश इतके तापमान नोंदविण्यात आले. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
चैत्र महिन्यातच वैशाखाचा वणवा जाणवू लागला असून एप्रिलच्या मध्यात महाराष्ट्र होरपळला आहे. संपूर्ण आठवडाभर सूर्य असाच आग ओकणार असल्याने यात भरच पडणार आहे.
कुठे? किती तापमान?
अकोला ४४.२०
अमरावती ४४०
वर्धा ४३.९०
नागपूर ४३.४०
सोलापूर ४३.३०
मालेगाव ४३.२०
बीड ४३.१०
गडचिरोली ४२.६०
जळगाव ४२.३०
बुलढाणा ४२.२०
चंद्रपूर ४२.६०
यवतमाळ ४२.८०
वाशिम ४२.६०
गोंदिया ४२०
परभणी ४२०
सांगली ४१.८०
धाराशिव ४१०
सातारा ४०.९०
छ. संभाजीनगर ४०.८०
जालना ४०.६०
कोल्हापूर ३९.६०
नाशिक ३८.८०
नंदुरबार ३८.४०
ठाणे ३७०
अकाेल्यात उन्हात एक रिक्षाचालक भाेवळ येऊन पडला. रुग्णालयात पाेहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंगोलीत उष्माघाताचा बळी
हिंगोली : बस स्थानकावर नातेवाइकाला साेडवण्यासाठी आलेल्या शेख रफिक शेख उस्मान यांचा मृतदेह हिंगोली बसस्थानकातील प्लॅटफॉर्मवर आढळून आला. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला.
१८ एप्रिल (वैशाख मासारंभ)पासून एप्रिल अखेरपर्यंत राज्यात तापमान वाढेल. मुंबईसह कोकणातील ७ जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा तापमानात अधिक वाढ जाणवेल. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
- माणिकराव खुळे,
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ
काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थितीची शक्यता आहे. विदर्भात ४२ पेक्षा जास्त, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ३८ ते ४० आणि कोकणात हवामान उष्ण दमट राहील.
- कृष्णानंद होसाळीकर,
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ