विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
By यदू जोशी | Updated: April 16, 2026 09:35 IST2026-04-16T07:58:13+5:302026-04-16T09:35:29+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. २० जिल्हा परिषदांची निवडणूक होणे बाकी असले, तरी या निवडणुकीला नियमानुसार अडचण येणार नाही, असे चित्र आहे.

विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
- यदु जोशी
मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. २० जिल्हा परिषदांची निवडणूक होणे बाकी असले, तरी या निवडणुकीला नियमानुसार अडचण येणार नाही, असे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदार हे महापालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदांचे सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती असतात. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्यामुळे या मतदारसंघांमध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही तेथे निवडणूक होऊ शकली नव्हती. परिणामत: दोन-अडीच वर्षांपासून आमदारकीच्या या जागा रिक्त आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या कार्यालयाकडून विधान परिषदेच्या १७ मतदारसंघांमधील निवडणुकीसंदर्भातील अहवाल एक-दोन दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रीय आयोग या निवडणुकीची घोषणा करेल, अशी शक्यता आहे. या १७ मतदारसंघांमध्ये बहुसंख्येने महायुतीचे मोठे संख्याबळ असल्याने मविआच्या तुलनेत महायुतीला मोठे यश मिळेल, असे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिका, नगरपालिका आणि १२ जिल्हा परिषदांमधील निवडणूक झाली. मात्र, २० जिल्हा परिषदांमधील निवडणूक बाकी आहे. राज्यात एकूण ३४ जिल्हा परिषदा असून, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेत लोकनियुक्त पदाधिकारी आहेत. त्यांची मुदत २०२७ मध्ये संपणार आहे.
निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या ७५ टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या ही ७५ टक्के वा त्यापेक्षा अधिक असल्याने तेथे निवडणूक होण्यात कोणतीही अडचण नाही. २० जिल्हा परिषदांची निवडणूक होण्याआधीच त्यामुळे ही निवडणूक नियमानुसार घेता येणार आहे. २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची वाट पाहणे नियमानुसार गरजेचे नसेल. असे निवडणूक आयोगाच्या नियमात नमूद आहे.
त्या नऊ जागांसाठी लवकरच निवडणूक
विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या नऊ जागांसाठीची निवडणूक येत्या चार-पाच दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
त्यात भाजपच्या वाट्याला ५, शिंदेसेनेला २,
राष्ट्रवादी (अजित पवार)ला एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळेल, असे धानसभेतील संख्याबळानुसार चित्र आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार)कडे अधिकची
१३ मते आहेत. त्यामुळे त्यांनी दुसरी जागा लढवावी, असे महायुतीने ठरवले तर निवडणूक बिनविरोध होणार नाही.
या १७ मतदारसंघांमध्ये होऊ शकते निवडणूक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या मतदारसंघांमध्ये विधान परिषद निवडणूक होण्यात आता अडचण नाही, असे मतदारसंघ - सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना, नागपूर.