मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:07 IST2026-04-24T13:04:24+5:302026-04-24T13:07:34+5:30
Ganesh Naik And Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे.

मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
Ganesh Naik And Eknath Shinde News: नवी मुंबईवर हुकूमत कोणाची, यावरून महानगरपालिका निवडणुकीपासून सुरू झालेला भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आणि विरोधकांमधील वाद अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गणेश नाईकांना घेरण्याची संधी विरोधक सोडताना दिसत नाहीत. यातच मंत्रिमंडळात एकत्र बसायचे आणि बाहेर पडताच एकमेकांविरोधात कुरघोड्या करायच्या, हे कधीपर्यंत चालणार, अशी कुजबुज नागरिकांमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.
नवी मुंबई महापालिकेत भाजप नगरसेवकांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. त्यातच महापालिका स्वायत्ता संस्था असून आम्ही करू तेच कायदे, राज्य शासन त्यांचे आदेश लादू शकत नाही, त्यांचे कायदे आम्हाला नको आहेत, असे भाजपचे सदस्य सांगू लागले आहेत. सभागृहात ते अशी वक्तव्य करीत आहेत. यामुळे विरोधकांनी यावरून भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनाच घेरले. तुम्ही मंत्री या नात्याने राज्य शासनाचे घटक आहात. तुमच्या विधी मंडळाने केलेले कायदे तुमचे नगरसेवक पाळत नाहीत. अशाने त्यांचे सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. ही आपबिती टाळण्यासाठी नाईक साहेब तुम्ही तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा, असे विरोधकच नव्हे तर अधिकारीही म्हणू लागले आहेत, असे म्हटले जात आहे. यानंतर आता नागरिकांमध्ये यावरून नाराजी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मंत्रिमंडळात एकत्र, नवी मुंबईत विरोधात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात व देशात एकत्र असलेले भाजप व शिंदेसेना नवी मुंबईमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. शिंदे स्वतः एक 'शब्द' उच्चारत नसले तरी त्यांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे, उपनेते विजय चौगुले हे गणेश नाईक यांचा समाचार घेत आहेत. राज्यातील दोन मंत्र्यांमधील वाद कधी मिटणार? असा प्रश्न नवी मुंबईकरही विचारू लागले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात एकत्र बसायचे व बाहेर एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करायच्या, हे कधीपर्यंत चालणार? अशी नाराजीही नागरिक उघड करू लागले आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चिघळत चालल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते सातत्याने गणेश नाईक यांच्यावर टीका करत असून, गणेश नाईकही प्रत्युत्तर देत आहेत. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींची चर्चा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतल्याचे सांगितले जात आहे.