लाखोंचा पोशिंदा...! अजित पवारांचा घातपात झाला का? विचारल्यावर भाजपला...; सुषमा अंधारेंनी सरकारला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:24 IST2026-02-04T14:23:19+5:302026-02-04T14:24:24+5:30
Sushma Andhare question on Ajit Pawar Plane Crash: सोलापूरच्या सभेत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या निधनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. बंदी असलेल्या विमानाचा वापर का झाला? असा सवाल करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

लाखोंचा पोशिंदा...! अजित पवारांचा घातपात झाला का? विचारल्यावर भाजपला...; सुषमा अंधारेंनी सरकारला घेरले
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "अजित पवार ही राज्याची संपत्ती होती, पण त्यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा घातपात होता का?" असा खळबळजनक संशय त्यांनी सोलापूरच्या प्रचारसभेत व्यक्त केला.
सुषमा अंधारे यांनी अजित पवार वापरत असलेल्या विमानाबाबत तांत्रिक प्रश्न उपस्थित केले. "आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक मंडळाने ज्या विमानावर एक वर्षापूर्वी बंदी घातली होती, तेच विमान अजित दादांच्या प्रवासासाठी का वापरले गेले? स्वतःच्या सुरक्षेबाबत कमालीचे जागरूक असणारे दादा अशा विमानातून प्रवास कसा काय करतील?" असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
"मी आज प्रचाराचा विषय मांडणार नाही, कारण सोन्यासारखा माणूस आपण गमावला आहे. 'लाख जावो, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' ही आपली संस्कृती आहे. दादांच्या अपघाताबाबत उड्डाण नियामक मंडळाने स्पष्टता द्यायला हवी होती, पण भाजपकडून उत्तरे दिली जात आहेत.हा घातपात होता का? हा प्रश्न विचारण्याचा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला हक्क आहे. असा प्रश्न उपस्थित होत असताना भाजपला त्याचा राग का येतो" असा सवाल अंधारे यांनी केला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांना टोला
यावेळी त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही निशाणा साधला. "पालकमंत्री जर पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी गल्लीगल्लीत सभा घेत असतील, तर उद्या गावच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष निवडण्यासाठीही ते बैठक घेतात का?" असा खोचक टोला त्यांनी लगावला.