'लातूर पॅटर्न'चा पुन्हा डंका! राज्यातील १७९ पैकी १०४ 'शंभर नंबरी' विद्यार्थी एकट्या लातूर विभागाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:51 IST2026-05-09T11:50:34+5:302026-05-09T11:51:32+5:30
"गुणवत्तेचा वारसा कायम!" लातूर जिल्ह्याचा निकाल ९२.८० टक्के; मुलींनी मारली बाजी, तर १०४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण.

'लातूर पॅटर्न'चा पुन्हा डंका! राज्यातील १७९ पैकी १०४ 'शंभर नंबरी' विद्यार्थी एकट्या लातूर विभागाचे
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, लातूर विभागाने आपला गुणवत्तेचा वारसा यंदाही जपला आहे. लातूर विभागाचा एकूण निकाल ८८.४२ टक्के लागला असून, विशेष म्हणजे राज्यातल्या १७९ विद्यार्थ्यांपैकी लातूर विभागातील तब्बल १०४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण मिळवून 'लातूर पॅटर्न' चा झेंडा पुन्हा एकदा फडकवला आहे.
लातूर विभागातून एकूण १,०६,७०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९४,३५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी ८८.४२ टक्के असली, तरी गुणवत्ता श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तसेच लातूर विभागात लातूर जिल्ह्याने ९२.८० टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लातूर विभागाची कामगिरी...!
विशेष प्रावीण्य : २७,९९५ विद्यार्थी
प्रथम श्रेणी : २९,५०९ विद्यार्थी
द्वितीय श्रेणी : २५,७५६ विद्यार्थी
उत्तीर्ण श्रेणी : ११,०९४ विद्यार्थी
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : ९४३५४
मुलींचे वर्चस्व कायम..!
राज्यासह लातूर विभागातही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. राज्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ५.४० टक्के अधिक आहे, तर लातूर विभागात हेच प्रमाण ७.१६ टक्के इतके आहे. प्रतिकूल परिस्थितीतही मुलींनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद ठरत आहे.
जिल्हानिहाय कामगिरी : लातूर अव्वल..!
लातूर विभागात लातूर जिल्ह्याने ९२.८० टक्के निकालासह प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लातूर जिल्हा : ९२.८० टक्के (३४,९७० उत्तीर्ण)
धाराशिव जिल्हा : ९१.२९ टक्के (१९,८०४ उत्तीर्ण)
नांदेड जिल्हा : ८३.६२ टक्के (३९,५८० उत्तीर्ण)
निकालात किंचित घट, पण गुणवत्तेत वाढ...!
गेल्या वर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल ४.३ टक्क्यांनी कमी झाला असला, तरी गुणवत्तापूर्ण निकालाचा आलेख उंचावलेला आहे. १०४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण आणि २७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळणे, हे लातूर विभागाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतीक आहे, असे लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
विभागनिहाय १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या :
लातूर : १०४
छत्रपती संभाजीनगर : २४
कोल्हापूर : १५
पुणे : १२
कोकण : ७
नाशिक : ६
मुंबई : ५
अमरावती : ३
नागपूर : ३
एकूण : १७९