“मराठी तरुणांची मानसिकता...”; शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:08 IST2026-01-25T11:08:52+5:302026-01-25T11:08:52+5:30
Gulabrao Patil News: बिहारचा माणूस इथे येऊन पोट भरतो आणि आपण बिहारींवर टीका करतो. तुम्ही का टीका करता, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

“मराठी तरुणांची मानसिकता...”; शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने नवा वाद
Gulabrao Patil News: नोकऱ्या आहेत, ती करण्याची मानसिकता नाही. बिहारचा माणूस इथे येऊन पोट भरतो आणि आपण बिहारींवर टीका करतो. तुम्ही का टीका करता. मराठी माणसात काम करण्याची मानसिकता नाही. कोण म्हणत आहे की, काम नाही. काम आहे. तरुणांना राग आला तर आला. कारण आता ४ वर्षांनी निवडणुका आहेत. तेंव्हाचे तेव्हा बघ, असे शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगावातील एका कार्यशाळेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, आपण नुसत्या गोष्टी ऐकतो अंबानी असा होता तसा होता, त्यांनी पण शून्यापासून सुरुवात केली. तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही पण प्रयत्न करून बघा ना, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला. मी काय राजकारणी होतो का? मात्र आता आमच्या धंद्यात पण आम्ही श्रेष्ठ आहोत. प्रत्येक गोष्टींमध्ये नैपुण्य दाखवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
एमआयडीसीला 'डी प्लस' दर्जा मिळण्यासाठी सात वर्षे लढलो
जळगावच्या एमआयडीसीला 'डी प्लस'चा दर्जा मिळावा यासाठी सात वर्षे लढलो. सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले. शेवटी हा विषय कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. आमच्या आजूबाजूला सर्व जिल्ह्यांना एमआयडीसी मध्ये दर्जा होता. मग आम्हाला का नाही? आम्ही का दुसऱ्याचे लेकरू होतो का या शब्दात बोललो, अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली.
दरम्यान, छोटे छोटे उद्योग आले तरच इतर उद्योग मोठे होतील. जळगाव जिल्ह्यातील केळीवर आधारित उद्योगांची मोठी गरज आहे. राज्यातल्या सर्व अंगणवाड्यांमधील पोषण आहारात केळीचा समावेश करा, याबद्दलची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.