"पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यास महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन लावा अशी फडणवीसांची भूमिका असेल का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 12:44 IST2021-04-11T12:42:20+5:302021-04-11T12:44:27+5:30

संजय राऊतांनी लगावला टोला.

shiv sena leader slams devendra fadnavis over opposing lockdown maharashtra coronavirus pm narendra modi | "पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यास महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन लावा अशी फडणवीसांची भूमिका असेल का?"

"पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यास महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन लावा अशी फडणवीसांची भूमिका असेल का?"

ठळक मुद्देजर देशात लॉकडाऊनची गरज आहे असं वाटलं तर पंतप्रधान मन की बात मधून ते देशाला सांगतील : संजय राऊतसंकटाच्या परिस्थितीत अशा प्रकारचं राजकारण करणं हे अशोभनीय, राऊतांची टीका

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. परंतु राज्यातील जनतेचं म्हणणं असल्याचं सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. "फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केलाही असेल. ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे. त्यांची देशपातळीवरील भूमिका निराळी असू शकते. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का?," असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. 

संकटाच्या परिस्थितीत अशा प्रकारचं राजकारण करणं हे अशोभनीय आहे. हे आम्हाला आणि विरोधकांसाठीही अशोभनीय आहे. सरळ रस्त्यावरून जात यावर आपल्याला मार्ग शोधायला हवा आणि लोकांचे जीव आपण वाचवले पाहिजे, असंही राऊत यावेळी म्हणाले. "देशात लॉकडाऊनची गरज आहे का नाही याचा निर्णय पंतप्रधान मोदी घेतील. परंतु शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे मुद्देही लक्षात घेतले आहे. त्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. जर देशात लॉकडाऊनची गरज आहे असं वाटलं तर पंतप्रधान मन की बात मधून ते देशाला सांगतील. पण पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर सरकार यावर निर्णय घेऊ शकतं. त्या ठिकाणी कोरोना नाही असं नाहीये. थोड्याच दिवसात भयावह परिस्थिती समोर येईल. सध्या लसींचे जास्तीजास्त डोस हे राज्यांना दिले गेले पाहेज. लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या लसीचा आमि औषधांचा गैरवापर होऊ नये. गुजरातबद्दल जास्त प्रेम असलं तरी संपूर्ण देशही तुमचा आहे," असं म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली. 

जावडेकरांवर साधला निशाणा

संजय राऊत यांनी बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला. "प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावं आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी," असं म्हणत राऊत यांनी जावडेकरांना टोला लगावला. 
 

Web Title: shiv sena leader slams devendra fadnavis over opposing lockdown maharashtra coronavirus pm narendra modi