दुर्मीळ हस्तलिखिते आता राष्ट्रीय डिजिटल संग्रहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 07:28 IST2026-04-21T07:27:24+5:302026-04-21T07:28:04+5:30
भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दुर्मीळ हस्तलिखितांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. देशभरातील मौल्यवान हस्तलिखितांचा शोध, नोंदणी आणि डिजिटल स्वरूपात संग्रह करण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या अंतर्गत राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारण्यात येणार आहे.

दुर्मीळ हस्तलिखिते आता राष्ट्रीय डिजिटल संग्रहात
खलील गिरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दुर्मीळ हस्तलिखितांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. देशभरातील मौल्यवान हस्तलिखितांचा शोध, नोंदणी आणि डिजिटल स्वरूपात संग्रह करण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या अंतर्गत राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारण्यात येणार आहे.
ज्ञानसंपदेचे एकत्रित संकलन आणि सर्वांसाठी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ केला आहे. यात देशभरातील शैक्षणिक संस्था संग्रहालय, ग्रंथालय, धार्मिक संस्था तसेच खासगी संग्रह यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच देशाच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.
या उपक्रमामुळे राज्यात किती हस्तलिखिते आहेत हे सरकारला, अभ्यासकांना व संशोधकांना कळेल. तसेच अभ्यासक व संशोधकांसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल. तसेच दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना उघड होऊन त्यांचे जतन करणे शक्य होईल. अशोक मा. गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र
विखुरलेले ज्ञानभांडार एकत्र
- राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या ताब्यातील हस्तलिखितांची माहिती ‘ज्ञानभारतम्’ या मोबाइल ॲपवर अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांमार्फत संबंधित ग्रंथालयांचा एकत्रित अहवाल सहायक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडे सादर करून पुढे ग्रंथालय संचालनालयाला पाठविण्याचे निर्देश ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी दिले आहेत.
- देशाला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपरिक ज्ञान हे पिढी दर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारित होत आलेले आहे. जागोजागी विखुरलेल्या हस्तलिखितांचे ज्ञानभांडार एकत्र ठिकाणी उपलब्ध करून देता यावे या दृष्टीने हा प्रकल्प राबवला जात आहे.