कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 06:34 IST2026-04-28T06:34:00+5:302026-04-28T06:34:59+5:30
विधान परिषदेच्या १० जागांसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. यातील शिंदेसेनेकडे २ जागा आहेत.

कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
आम्हाला बैठकीला का बोलावले नाही?
रिक्षाचालकांना मराठी सक्तीसंदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक बोलावली होती. त्यासाठी त्यांनी कल्याण, डोंबिवलीतून शेखर जोशी, जितेंद्र पवार, संतोष नवले आदी पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. मात्र भाजप, उद्धवसेना, लाल बावटा आदी संघटनांना का बोलावले नाही याचीच चर्चा सुरू होती. कल्याण-डोंबिवलीत पाच रिक्षाचालक-मालक संघटना आहेत. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला का बोलावले नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
हे सभागृह आहे की राजकीय ‘चावडी’
नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेनेच्या महिला सदस्यांमध्ये सुरू झालेला शाब्दिक ‘फटका’ पाहता, विषय कुठे आणि वाद कुठे, असा सवाल उपस्थित झाला. यात ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांनी “चावडीवरील गप्पा” असा टोला लगावताच, त्यात ठिणगी पडली. “बाहेरून येणारे जास्त बोलतात” या त्यांच्या वाक्याने दोन्ही बाजूंच्या नगरसेविका आक्रमक झाल्या. यामुळे सभागृहात निर्णय कमी, तर ‘डायलॉग’ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा व्यक्तींवर टीका आणि गोंधळ, हेच चित्र समोर आले. यामुळे करदात्यांच्या पैशातून चालणारी सभा आहे की, राजकीय ‘चावडी’? असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत.
‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाणा’
विधान परिषदेच्या १० जागांसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. यातील शिंदेसेनेकडे २ जागा आहेत. शिंदेसेनेच्या आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे या निवृत्त होत असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून, नव्या चेहऱ्याला संधी देण्याची गरज असल्याचे सांगत, काम न करणाऱ्याला परिषदेवर पाठवायचे तर लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकले यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी केली. या पत्रातून तृप्तीताईंचे बिचुकलेंच्या नावावर ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाणा’ तर नाही ना!, अशी चर्चा सुरू आहे.
विरोधी पक्षात एकमत कधी?
पनवेल महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. शिंदे गटाच्या दोन नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा आहे. मात्र, विरोधी पक्षात बसलेल्या उद्धवसेना, काँग्रेस आणि शेकापमध्ये एकमत नसल्याचे दिसून येत आहे. महासभेत कोणी काय बोलावे, हे भाजप महायुती बैठक घेऊन अगोदरच ठरवत असते. त्यामुळे सभागृहात पूर्ण रणनीती आखूनच भाजप महायुती कामकाज करते. मात्र विरोधी पक्षात ते सामंजस्य दिसून येत नाही. त्यातच शेकाप, काँग्रेस यांचा स्वतंत्र गट आणि उद्धवसेनेची स्वतंत्र नोंदणी केल्यानंतर विरोधी पक्षात बहुतांशी वेळा एकमत नसल्याचे दिसून येत आहे.