Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:26 IST2026-04-28T08:24:59+5:302026-04-28T08:26:07+5:30
Hingoli Vasmat Earthquake: हिंगोलीच्या वसमत तालुक्यात सोमवारी रात्री पुन्हा एकदा भूगर्भातून मोठा आवाज आला आणि जमीन हादरली. एप्रिल महिन्यातील हा चौथा प्रकार असल्याने पांगरा शिंदेसह परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे.

Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
वसमत (हिंगोली): तालुक्यात मागील काही दिवसांपासून भूगर्भातून येणारे आवाज आणि जमिनीला बसणारे धक्के थांबण्याचे नाव घेत नाहीत. सोमवारी रात्री पुन्हा एकदा जोरदार धक्क्याने जमीन हादरली असून, एकाच महिन्यात चौथ्यांदा असा प्रकार घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भुकंपाची मात्र नोंद झाली नाही.
वसमत तालुक्यात सोमवारी रात्री ११.३५ वाजेच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज आला आणि जमीन हादरली. या धक्क्याचा सर्वाधिक प्रभाव पांगरा शिंदे,वापटी,कुपटी, शिरळी आणि खांबाळा या गावांमध्ये जाणवला. गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना या धक्क्याने जागे केले. भीतीपोटी अनेक ग्रामस्थांनी घर सोडून मोकळ्या मैदानात धाव घेतली आणि संपूर्ण रात्र दहशतीत काढली.
एप्रिल महिन्यातील हा चौथा धक्का
वसमत तालुक्यासाठी एप्रिल महिना भूकंपाच्या दृष्टीने चिंतेचा ठरत आहे.
११ एप्रिल सकाळी पहिला मोठा धक्का जाणवला होता.त्यानंतर लगेच एक धक्का बसला,२२ एप्रिल रोजी दुपारी भुकंपाने तालुका हादरला होता,२७ एप्रिल रात्री ११.३५ वाजता महिनाभरातील चौथा धक्का बसला.या धक्याचे नोंद झाली नसली तरी नागरिकांत भिती व्यक्त केल्या जात आहे.
नागरिकांची मागणी: 'प्रशासनाने दखल घ्यावी'
गेल्या ७ ते ८ वर्षांपासून वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्यांना भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. पांगरा शिंदे आणि परिसरातील नागरिकांच्या मते, हे धक्के भविष्यातील मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे, "सतत होणारे हे धक्के आता अंगवळणी पडत असले, तरी रात्रीच्या वेळी बसणाऱ्या धक्क्यांमुळे मोठी भीती वाटते. प्रशासनाने तातडीने भूगर्भशास्त्रज्ञांमार्फत या भागाची पाहणी करून येथील जमिनीच्या हालचालींचा अभ्यास करावा," अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचवाव्यात, अशी विनंती सध्या जोर धरत आहे.