पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:52 IST2026-04-28T08:49:10+5:302026-04-28T08:52:30+5:30
पक्षाबाहेर राहून त्यांना आमदार केले तर ते आम्हालाच त्रास देतील, असे विशेषत: विदर्भातील शिंदेसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
मुंबई - विधान परिषद निवडणुकीत एक ट्विस्ट आला असून प्रहार जनशक्ती पार्टीचे विलीनीकरण करण्याच्या अटीवर या पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिंदेसेनेकडून विधान परिषदेची जागा ऑफर करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत कडू हे मंगळवारी भूमिका जाहीर करणार आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात बच्चू कडू विरुद्ध भाजप असे चित्र असताना कडू हे शिंदेसेनेत गेल्यास भाजपची भूमिका काय असेल, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. विलीनीकरणाबाबत कोणती भूमिका घ्यावी यासाठी कडू यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मेसेजेस करून त्यांची मते मागविली आहेत. कडू यांना उमेदवारी देण्यास शिंदेसेनेतील नेते, मंत्री, आमदारांचा विरोध असल्याचे म्हटले जाते. पक्षाबाहेर राहून त्यांना आमदार केले तर ते आम्हालाच त्रास देतील, असे विशेषत: विदर्भातील शिंदेसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढविली तर सर्व नऊ जागांची निवड ही बिनविरोध होईल. दहावी जागा निश्चितपणे भाजपला मिळेल, कारण ही निवडणूक १२ मे रोजीच पण स्वतंत्रपणे होणार आहे.
भाजपकडून १५ नावे दिल्लीला
भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीने ३० नावे दिल्लीला पक्षनेतृत्वाकडे पाठविली होती. ही यादी निम्मी करून पाठवा असा निरोप दिल्लीहून आल्यानंतर आता त्यातलीच १५ नावे दिल्लीला पाठविण्यात आली आहेत.
नऊपैकी सर्वाधिक सहा जागा भाजपला
विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठीची निवडणूक आणि एका जागेची पोटनिवडणूक ही १२ मे रोजी होणार आहे. २८ किंवा २९ एप्रिलला भाजपचे उमेदवार दिल्लीहून जाहीर होतील. १० पैकी ६ जागा भाजपच्या वाट्याला, शिंदेसेनेला २, राष्ट्रवादीला (अजित पवार गट) एक आणि मविआला एक जागा मिळेल. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (शरद पवार गट) आधीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे स्वत:च्या उमेदवारीबाबत आता ठाकरे यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यांच्या पक्षाकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत असली तरी स्वत: ठाकरे यांनी लढण्याचा निर्णय घेतला तर निवडणूक बिनविरोध होईल.
ठाकरेंशिवाय अन्य कोणी उमेदवार असल्यास फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते. अशा परिस्थितीत महायुतीकडून सगळ्या जागांवर उमेदवार टाकण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर पुन्हा जाण्याचा निर्णय घेतील अशी शक्यता अधिक आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षातूनही त्यांना आग्रह केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
राष्ट्रवादीकडून कोण?
राष्ट्रवादीत (अजित पवार गट) आपली टीम बांधण्याची सुरुवात म्हणून पार्थ पवार हे तरुण रक्ताला संधी देतील असे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत, माजी खा. आनंद परांजपे, खा. प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती राजेंद्र जैन, माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे, माजी आमदार सुनील टिंगरे, उमेश पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
सुनील तटकरे खासदार अन् प्रदेशाध्यक्ष असून कन्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री असताना आणखी एक पद त्यांच्या घरात दिले जाईल का, हा प्रश्न आहे. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत. अजित पवार आणि त्यांच्या परिवाराशी असलेली निकटता ही त्यांची जमेची बाजू आहे.
कोकणातील नेत्याला मिळणार आमदारकी...
भाजपला सहा जागा मिळणार असल्या तरी त्यात काँग्रेस सोडून आलेल्या प्रज्ञा सातव यांचे एक नाव पक्के मानले जाते. म्हणजे भाजपला पाच उमेदवार द्यायचे आहेत. त्यासाठी किमान ७५ जण दावेदार आहेत. कोकणातील एका लहान पक्षाचे बडे नेते आहेत ज्यांना भाजपमध्ये आणून आमदारकी देण्यावर विचार सुरू आहे. प्रदेश भाजपमध्ये पदाधिकारी असलेल्या एका महिला नेत्याचे नाव नक्की मानले जात आहे.