“मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक”: नितेश राणे, प्लास्टिकमुक्त कोळीवाडा मोहीम राबवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 20:08 IST2026-04-29T20:07:26+5:302026-04-29T20:08:18+5:30
Minister Nitesh Rane News: मच्छीमारांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मंत्री नितेश राणे यांनी यावेळी केला.

“मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक”: नितेश राणे, प्लास्टिकमुक्त कोळीवाडा मोहीम राबवा
Minister Nitesh Rane News: मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीस देऊन त्याला अधिक सक्षम करण्यासाठी विभाग प्रयत्नशील असून मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना लागू असलेल्या बल्क ग्राहक डिझेल दर वर्गीकरणात बदल करून दिलासा देण्याबाबत प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत राणे बोलत होते. यावेळी खासदार वर्षा गायकवाड तसेच विविध मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मच्छीमारांसमोरील विविध गंभीर प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील, राज्यातील मच्छीमारांना २० मार्च २०२६ पासून बल्क कंझ्युमर श्रेणीत वर्ग करण्यात आल्यामुळे डिझेल दरात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय मागे घेऊन मच्छीमारांना पूर्वीप्रमाणे अनुदानित दरात डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार सकारात्मक विचार करत आहे. पारंपरिक व लघु मच्छीमारांचे हित जपणे हे सरकारचे प्राधान्य आहे .पावसाळी मासेमारी बंदी काळात खोल समुद्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान, कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून तो तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल. प्लास्टिक मुक्त कोळी वाडा मोहीम राबविण्याचे आवाहन मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना राणे यांनी केले. तसेच मुंबई व महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रांमध्ये होत असलेल्या अनधिकृत छाटणी, भराव आणि अतिक्रमणावर वनविभाग, पोलीस आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईद्वारे आळा घातला जाईल. मच्छीमारांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मंत्री नितेश राणे यांनी यावेळी केला.