महाराष्ट्र निवडणूक 2019: 'गुरगुरणाऱ्या वाघाचं काय करायचं हे मला माहितीय, मी वनमंत्री आहे!'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 03:05 PM2019-11-02T15:05:32+5:302019-11-02T15:06:09+5:30

Maharashtra Election Result 2019: राष्ट्रपती राजवटीच्या विधानावरून टीका करणाऱ्या शिवसेनेला मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

Maharashtra Vidhan Sabha Result bjp leader sudhir mungantiwar hits back to shiv sena over presidents rule | महाराष्ट्र निवडणूक 2019: 'गुरगुरणाऱ्या वाघाचं काय करायचं हे मला माहितीय, मी वनमंत्री आहे!'

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'गुरगुरणाऱ्या वाघाचं काय करायचं हे मला माहितीय, मी वनमंत्री आहे!'

Next

मुंबई: शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून सुरू असलेला संघर्ष सुरूच असल्याचं दिसत आहे. राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून भाजपाला 'सामना'मधून लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेला आता सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे. वाघ अग्रलेख लिहून गुरगुरणार असेल तर मी वनमंत्री आहे. वाघाचं संवर्धन आणि संरक्षण कसं करतात याची मला कल्पना आहे.  शिवसेना भाजपची युती टिकण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले. त्यामुळे आता वाघ गुरगुरत असला, तरी त्याला सोबत घ्यायचंच आहे,  अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर पलटवार केला. 

राज्यात सात दिवसांत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. यावरुन आज शिवसेनेनं 'सामना'मधून मुनगंटीवारांवर प्रत्युत्तर दिलं. सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं.

राष्ट्रपती राजवटीची धमकी ही तर मोगलाई; शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

शिवसेनेच्या टीकेवर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. मी केवळ तांत्रिक बाब सांगितली. सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होते, यात चूक काय, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मित्रपक्ष वड्याचं तेल वांग्यावर काढत असल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला.

'मुख्यमंत्र्यांच्या वाक्याने राग येतो; मग भाजपाबद्दल वाईट अग्रलेख लिहिलेत त्याचं काय?

शिवसेनेवर भाष्य करताना मुनगंटीवार यांनी बालभारतीमधल्या एका धड्याचा संदर्भ दिला. 'मला बालभारतीच्या पुस्तकातली एक गोष्ट आठवते. भित्र्या सशाची ती गोष्ट होती. झाडाचं एक पान गळून नेमकं सशाच्या पाठीवर पडतं. तेव्हा त्याला आभाळ कोसळल्यासारखं वाटतं आणि तो सैरावैरा पळू लागतो. बालभारतीमधला हा धडा मला आजही आठवतो. बाकीच्यांना तो आठवतो का ते माहीत नाही,' असं सूचक विधान मुनगंटीवारांनी केलं. 

'सामना'तून शिवसेनेनं काय टीका केली होती?
महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे एक विनोदी शोभायात्राच बनली आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राची अशी विनोदी शोभायात्रा झाली असेल तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? सध्याचा गोंधळ म्हणजे 'शिवशाही' नाही. राज्यात सरकार नाहीच, पण मावळत्या सरकारातील विझलेले काजवे रोज नवे विनोद घडवून महाराष्ट्रास अडचणीत आणू पाहत आहेत. धमक्या, तपास यंत्रणांची जोरजबरदस्ती यांचा काही एक परिणाम न झाल्याने मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या धमकीचा पाद्रा पावटा सोडला आहे. '7 नोव्हेंबरपर्यंत सत्तेचा तिढा न सुटल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल.' श्री. मुनगंटीवार व त्यांच्या पक्षाच्या मनात नेमके कोणते विष उसळते आहे ते या वक्तव्यावरून दिसते. कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास कमी पडला की हे व्हायचेच किंवा कायदा अथवा घटनेची गळचेपी करून हवे ते साध्य करायचे ही भूमिकासुद्धा त्यामागे असू शकते. एक तर राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील 'भाजप' कार्यालयात पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का?, असा सवाल शिवसेनेनं सामनामधून उपस्थित केला आहे.


 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result bjp leader sudhir mungantiwar hits back to shiv sena over presidents rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.