27 Feb, 26 08:18 PM
उल्हासनगर महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी, नागरिकांना हरित शपथ व पाणी बचतीचे आवाहन
होळी आणि धुलीवंदन हे सण अवघ्या काही दिवसांवर आले असून या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या निर्देशानुसार, शहरात प्रदूषणमुक्त आणि हरित सण साजरे व्हावेत यासाठी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पर्यावरणपूरक होळी व धुलीवंदन कार्यक्रमाचे उत्साहात साजरा करण्यात आला. उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे,अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
27 Feb, 26 07:52 PM
फडणवीस, सुनेत्रा पवार, भुजबळ यांचा VSRच्या विमानाने नाशिक-मुंबई प्रवास
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी VSRच्या विमानातून नाशिक ते मुंबई असा प्रवास केला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या कंपनीच्या विमानसेवेवर आणि दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
27 Feb, 26 05:48 PM
अफगाणिस्तान का मानत नाही डूरंड सीमा? ज्यावरून आता पाकिस्तानशी पुकारलंय खुलं युद्ध!
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर सध्या बंदुकांच्या गोळ्या आणि तोफांचे गोळे बरसत आहेत. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध 'खुल्या युद्धा'ची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर आता आमचा संयम संपल्याचे जाहीर केले आहे. पण, या दोन मुस्लिम राष्ट्रांमधील या भीषण संघर्षाच्या मुळाशी आहे १३३ वर्षांपूर्वी ओढलेली एक शापित रेषा, जिला जग 'डूरंड लाईन' म्हणून ओळखतं.
27 Feb, 26 05:39 PM
राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांची मागणी
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. हा तपास योग्य दिशेने होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
27 Feb, 26 05:22 PM
नीरा नदीवरील शतकभर जुना पूल पाडण्याचे आदेश; ग्रामस्थांचा तीव्र विरोध
नीरा नदीवरील सुमारे शतकभर जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश जितेंद्र डूड्डी यांनी दिल्यानंतर नीरा व पाडेगाव परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याशी ऐतिहासिक व भावनिक नाते असलेला हा पूल पाडण्याऐवजी त्याचे जतन करावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने सुरक्षेचा मुद्दा पुढे करत निर्णय घेतला असला, तरी स्थानिक नागरिकांनी हा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप केला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे जाताना नीरा नदी पार करतो आणि याच पुलावरून दत्त घाटावर निरास्नानासाठी पादुकांची मिरवणूक नेली जाते.
27 Feb, 26 05:22 PM
खामगावच्या घाटपुरी शिवारात बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी शिवारात बिबट्या असल्याची चर्चा रंगत होती. या चर्चेने शुक्रवारी सकाळी सत्याचे रूप घेतले, जेव्हा सोपान चोपडे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी सोपान चोपडे यांच्या शेतात नेहेमीप्रमाणे शेतमजूर कामात व्यस्त होते. दरम्यान, अचानक समोर बिबट्या दिसल्याने मजुरांची घाबरगुंडी उडाली. मजुरांनी आरडाओरड केल्याने बिबट्या परिसरातच दबा धरून बसला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस आणि वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी सुरू केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
27 Feb, 26 05:21 PM
चिखला वादाचा शाळेवर परिणाम; उपस्थिती घटली
बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये झालेल्या वादानंतर आता परिस्थिती निवळत आहे, जनजीवन देखील सुरळीत होत आहे.गावामध्ये 28 फेब्रुवारी पर्यंत जमाबंदी लागू करण्यात आली आहे, पोलिसांनी दोन्ही गटाकडून आलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत, मात्र गेल्या पाच-सहा दिवसापासून गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती निम्म्यावर आली आहे, सध्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची विनंती शिक्षकांकडून केली जात आहे.
27 Feb, 26 05:21 PM
वर्धाच्या समुद्रपूर–हिंगणघाटमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असताना आता गहू आणि चणा पिकांनाही फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पीक विम्याची प्रलंबित रक्कम तत्काळ देण्यात यावी आणि गहू-चना नुकसानीसाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, या मागणीसाठी युवा संघर्ष मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष तथा देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या शेतकऱ्यांच्य वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
27 Feb, 26 05:21 PM
महागाव नगरपंचायतीत भाजपाचा ‘चंद्रपूर पॅटर्न’ यशस्वी; अवघ्या ५ मतांनी सत्ता काबीज
महागाव नगरपंचायतीत भाजपाने राजकीय इतिहास रचत अवघ्या पाच मतांच्या फरकाने नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या रंजना दीपक आडे यांची १२ विरुद्ध ५ मतांनी नगराध्यक्षपदी निवड झाली. महागावमध्ये भाजपाचे ५, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ४ आणि काँग्रेसचे ३ बंडखोर नगरसेवक असे संख्याबळ होते. ठाकरे गटाने भाजपाला दिलेल्या पाठिंब्यामुळे तसेच काँग्रेसच्या तीन बंडखोरांनी आतून मतदान केल्याने राजकीय समीकरण पालटले. सर्वाधिक संख्याबळ काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे असूनही नगराध्यक्षपद राखण्यात त्यांना अपयश आले. राजकीय जुळवाजुळवीतून भाजपाने सत्ता काबीज करत महागाव नगरपंचायतीत मोठा उलटफेर घडवून आणला.
27 Feb, 26 05:18 PM
जालना–नांदेड समृद्धी महामार्गाचा मार्ग बदलणार? उपोषणानंतर नवे निर्देश
जालना–नांदेड समृद्धी महामार्ग रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरून नेऊ नये या मागणीसाठी जालन्यातील गांधीचमन भागात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा तोडगा निघाल्याची माहिती समोर आली आहे. रामनगर साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने महामार्गाचा मार्ग पूर्वनियोजित प्रमाणे ठेवावा व कारखान्याच्या जमिनीवरून नेऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्याने एका शेतकरी प्रतिनिधींनी आमरण उपोषण सुरू केले होते.
27 Feb, 26 05:17 PM
प्रशासकीय तांत्रिक चुकीचा फटका शेतकऱ्यांना; वसुली नोटिसांमुळे खळबळ
प्रशासकीय स्तरावर झालेल्या तांत्रिक चुकीचा फटका आता शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ‘अतिरिक्त अनुदान’ मिळाल्याच्या कारणावरून तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, संबंधित रक्कम तात्काळ जमा न केल्यास मालमत्तेवर बोजा टाकण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. आधीच अस्मानी-सुल्तानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
27 Feb, 26 05:17 PM
वर्धा–गोजी मार्गावरील खड्ड्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने वर्धा ते गोजी मार्गावरील बरबडी ते मांडवगड दरम्यानच्या खराब रस्त्याच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम विभागाला गिट्टी आणि डांबर भेट देत अनोखे आंदोलन करण्यात आले.
27 Feb, 26 05:16 PM
अकोला मनपामध्ये ‘टिपू सुलतान’ नावावरून शिंदे गटाचा ठिय्या आंदोलन…!
अकोला महानगरपालिकाच्या सभागृहाला देण्यात आलेल्या ‘हजरत टिपू सुलतान’ या नावावरून शहरात नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून संबंधित नावाचे बॅनर तत्काळ हटवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तर आज शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला आहे.
27 Feb, 26 05:16 PM
हिमायतनगर यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार…
श्री परमेश्वर मंदिर यात्रेनिमित्त पारंपरिक शंकरपट स्पर्धेला हजारोंचा प्रतिसाद हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर यात्रेनिमित्त आयोजित पारंपरिक बैलगाडा शर्यत अर्थात शंकरपट स्पर्धेला हजारो प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासूनच मैदानावर मोठी गर्दी उसळली होती. बैलांचा वेग, ताकद आणि समन्वयाचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मैदान गाठले. शर्यतीदरम्यान प्रत्येक फेरीत रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण परंपरेचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची उत्कृष्ट तयारी सादर केली.
27 Feb, 26 05:15 PM
आरटीईतील जाचक घंटीविरोधात वंचितचे ‘मुक्काम पोस्ट शाळा’ आंदोलन
यवतमाळ घाटंजी येथे आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी लागू जाचक अटींच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी घाटंजीतर्फे शाळेजवळ पाल ठोकून प्रतीकात्मक ‘मुक्काम पोस्ट शाळा’ आंदोलन करण्यात आले. एक किमी हवाई अंतराची अट रद्द करून किमान ५ किमीपर्यंत वाढवावी, अपवादात्मक प्रकरणात १० किमी सवलत द्यावी, भाडेकरार नोंदणीची सक्ती शिथिल करावी व तांत्रिक कारणांमुळे अडकलेल्या अर्जांना मुदतवाढ द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पालक व विद्यार्थी सहभागी झाले. मागण्या न मानल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
27 Feb, 26 05:11 PM
बायकोच्या व्हाट्सअपवर स्टेटवर केली अश्लील कमेंट, जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या
बायकोच्या व्हाट्सअप स्टेटस वर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेचार वाजता नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथे ही घटना घडली. आफताब शेख (२४) असे या हल्ल्यात मरण पावलेल्याचे नाव आहे.
27 Feb, 26 05:09 PM
शरद पवार मोठे नेते, पण राज्यसभेच्या जागेचा दावा सोडणार नाही: वरूण सरदेसाई
राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही. आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले मत मांडले आहे. सन २०२० साली आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. आता संख्याबळानुसार आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल. शरद पवार हे मोठे नेते आहेत, शरद पवार उमेदवार म्हणून इच्छुक असतील आणि त्यांच्या नेत्यांकडून तसेच महाविकास आघाडीकडून तसे बोलले गेले तरीही आम्ही आमचा राज्यसभेच्या जागेसाठीचा दावा सोडणार नाही, असे वरूण सरदेसाईंनी म्हटले आहे.
27 Feb, 26 04:29 PM
कृत्रिम फुलांच्या वापरावर पूर्णपणे बंदी; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे अधिक स्पष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र जीआर काढणार असल्याचे सांगितले.
27 Feb, 26 03:56 PM
अण्णा हजारेंकडून केजरीवालांसदर्भातील निर्णयाचे स्वागत; म्हणाले, 'न्यायव्यवस्थेवरच देशाचा आधार'
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची मद्य धोरण प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. "एवढा मोठा आणि विविधतेने नटलेला देश केवळ न्यायव्यवस्थेमुळेच सुरळीत चालतो, नाहीतर इथे अराजकता माजली असती. आता न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची बाजू ऐकून ते निर्दोष असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे हा निकाल सर्वांनी मान्य केलाच पाहिजे," असे अण्णा हजारे म्हणाले.
27 Feb, 26 02:43 PM
ईश्वरपूरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कृष्णा आणि वारणा नदीच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांसह सर्व पक्ष, संघटना आणि कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आज सकाळी ११ वाजता पंचायत समितीसमोरील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शक्तिपीठ विरोधी शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कचेरीवर धडकला.
27 Feb, 26 02:30 PM
एफआयआर नोंदवण्यात सरकारकडून अडथळे का आणले जातायत? राज ठाकरेंचा सवाल
अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली. रोहित पवार यांचा FIR का घेतला जात नाही याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले.
27 Feb, 26 02:12 PM
मराठी शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी सेमी-इंग्लिशची गरज- सत्यजित तांबे
"कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. जगभरातील सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. सध्या मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढले असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाकडे वळत आहेत. त्यामुळे मराठी शाळा सेमी-इंग्लिश झाल्या पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि पुढील शिक्षणासाठी अधिक सोयीचे होईल, असंही आमदार सत्यजित तांबे म्हणाले.
27 Feb, 26 01:36 PM
रोहित पवारांनी संशयकल्लोळ नाटक बंद करावे, भाजपाचा टोला
अजितदादांच्या विमान अपघात चौकशीबाबत सीआयडीने पत्रकार परिषद घेत अपघाताचा तपास कसा सुरु आहे, आतापर्यंत या तपासात काय काय समोर आले, या तपासाची सद्यस्थिती काय, हे स्पष्टपणे सांगितले. आता अजितदादांचा वारसा आपण चालवावा ही सुप्त इच्छा मनात असलेल्या रोहित पवारांनी संशयकल्लोळ नाटक बंद त्वरीत करावे - नवनाथ बन, भाजपाचे मुख्य प्रवक्ते
27 Feb, 26 01:13 PM
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आढळला बेपत्ता मजुराचा मृतदेह
मयत धोत्रे हे चार दिवसांपूर्वीच सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते..ते त्यांच्या इतर ४-५ साथीदारांसमवेत सिंहगड किल्ल्यावरील तानाजी मालुसरे समाधी परिसरातील पुरातत्व विभागाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे काम करीत होते.. हे सर्वजण सिंहगड किल्ल्यावरच वास्तव्यास होते.
27 Feb, 26 01:07 PM
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आमदार रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आमदार रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. अजितदादांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत चौकशीच्या मागणीसाठी
27 Feb, 26 01:00 PM
अरविंद केजरीवाल निर्दोष सुटल्यानंतर पत्नी सुनिता भावुक
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर लिहिलं की, "या जगात कोणी कितीही शक्तिशाली झालं तरी, तो 'शिवशक्ती'पेक्षा मोठा होऊ शकत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो." वाचा सविस्तर
27 Feb, 26 12:24 PM
महापौरांच्या हातात एक कोटीचं घड्याळ? रितू तावडेंनी सांगितलं सत्य
मुंबईच्या महापौर रितू तावडे आपल्या कामामुळे सध्या खूप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रितू तावडे यांनी घातलेल्या घड्याळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. घड्याळाची किंमत कोट्यवधीत असल्याचा मोठा दावा करण्यात आला. Rolex कंपनीच्या या घड्याळाची किंमत भारतात १ कोटीच्या आसपास असल्याचं म्हटलं गेलं. यावरून महापौरांना ट्रोलही करण्यात आलं. आता रितू तावडे यांनी घड्याळावर स्पष्टीकरण देत खरं काय ते सांगितलं आहे. वाचा सविस्तर
27 Feb, 26 12:05 PM
मराठी भाषा जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे- देवेंद्र फडणवीस
विधानभवनात आज मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे म्हटले आहे.
27 Feb, 26 12:02 PM
रोहित पवार शिवतीर्थ निवासस्थानी दाखल, राज ठाकरेंची घेणार भेट
आमदार रोहित पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी ते राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. अजित पवारांना न्याय देण्यासाठी राज ठाकरेंही लढाईत सहभागी व्हावं अशी रोहित पवारांची मागणी आहे.
27 Feb, 26 12:01 PM
: येवल्याच्या रायते शिवारातील प्लायवुड कंपनीला भीषण आग; कंपनी जळून खाक
येवला तालुक्यातील रायते शिवारात असलेल्या प्लायवुड कंपनीला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. घटनेवेळी कंपनीत सुमारे 30 ते 40 कामगार अडकले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य करून सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने जीवितहानी टळली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
27 Feb, 26 11:40 AM
ख्वाजा आसिफ यांचा भारताचा उल्लेख करत थेट इशारा!
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादाने आता अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. गुरुवारी उशिरा रात्री अफगाणिस्तानने कुनार प्रांतात केलेल्या भीषण हल्ल्यात तब्बल ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या मोठ्या जीवितहानीमुळे पाकिस्तान सरकार हादरले असून, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आता अफगाणिस्तानला खुल्या युद्धाचे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, या वादात त्यांनी भारताचे नाव ओढत तालिबानवर गंभीर आरोप केले आहेत.
27 Feb, 26 11:33 AM
तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग; धुराच्या लोटांमुळे परिसरात खळबळ
नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील डंपिंग ग्राउंडला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीचे स्वरूप इतके मोठे आहे की, डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे अजस्त्र ढिग जळून खाक झाले असून संपूर्ण परिसरात काळपट आणि दाट धुराचे लोट पसरले आहेत. या धुरामुळे लगतच्या वसाहतींमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. (सविस्तर वाचा)
27 Feb, 26 11:12 AM
मोदी-शाह यांनी रचलं षडयंत्र, कोर्टाच्या निकालानंतर केजरीवाल भावूक
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह २२ जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर केजरीवालांच्या डोळ्यात अश्रू आले. मोदी-शाह यांनी राजकीय षडयंत्र रचले आणि आम आदमी पक्षाच्या ५ नेत्यांना जेलमध्ये टाकले होते. मीडिया आणि भाजपाने आम्हाला भ्रष्टाचारी ठरवले हे सांगताना केजरीवाल भावूक झाले
27 Feb, 26 11:08 AM
अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व २३ जणांची निर्दोष मुक्तता
मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
27 Feb, 26 10:44 AM
शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; बदलापूर पुन्हा धक्कादायक प्रकार
बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरलंय. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूलबसमध्येच बस चालकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. महत्वाची बाब म्हणजे या स्कूल बसमध्ये कोणतीही महिला मदतीस नव्हती. बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणारी ही स्कूल बस आहे. या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकानं बसमध्ये तिचा विनयभंग केला. यानंतर पीडित विद्यार्थिनीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला.
27 Feb, 26 10:24 AM
पंढरपूर : आमलकी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी
फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पहाटेपासून विठुरायाची दर्शन रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यामुळे विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान पाच तासांचा कालावधी लागत आहे. तर मुखदर्शनासाठी दीड तासांचा कालावधी लागत आहे.
27 Feb, 26 10:21 AM
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर, राज्यसभेच्या ४ जागांसाठी भाजपात इच्छुकांची गर्दी, २४ जणांच्या नावाची यादी तयार, दिल्लीत रवींद्र चव्हाण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
27 Feb, 26 09:52 AM
अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात?
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच सीआयडीने मौन सोडले आहे. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर भाष्य केले आहे. अजित पवारांचा विमान अपघात होता की, घातपात होता या प्रत्येक पैलूने सीआयडी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. जर या तपासात हत्या, निष्काळजीपणा अथवा इतर कुठलेही गुन्हेगारी कृत्य समोर आले तर CID कायदेशीर रित्या यावर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. (आणखी वाचा)
27 Feb, 26 09:42 AM
चिपळूणमध्ये काँग्रेसचं ३ दिवसीय निवासी शिबीर
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. आजपासून या शिबिराला सुरुवात होईल. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते व संबंधित विषयातील तज्ज्ञही यावेळी मार्गदर्शन करतील.
27 Feb, 26 09:25 AM
तालिबानच्या २७ चौक्या पाकिस्तानने उडवल्या, नऊवर मिळवला ताबा
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचा भडका उडला आहे. दोन्ही अफगाणिस्तानातील तालिबान आणि पाकिस्तानी लष्कराने एकमेकांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मुशरफ झैदी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून, पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानी तालिबानच्या २७ चौक्या उडवल्या आहेत आणि ९ चौक्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा केला आहे.
अफगाणिस्तानी तालिबानच्या ८० पेक्षा जास्त रणगाडे, तोफा आणि वाहने नष्ट केल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.
27 Feb, 26 09:13 AM
पाकिस्तान-अफगाणिस्तानात युद्ध, संयुक्त राष्ट्राचा इशारा
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या काबुल, कंधार आणि पक्तिया या भागात एअरस्ट्राईक केले. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेत घुसून हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबानने गुरुवारी रात्री आक्रमक उत्तर दिले. अफगाणी सैन्याने पाकिस्तानच्या सीमेवरील चौक्यांना टार्गेट केले. त्यानंतर काही तासांत पाकिस्ताननेही पलटवार केला. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या सैन्य मुख्यालयासह अनेक तळांवर हल्ले सुरू केले आहेत. (सविस्तर वाचा)
27 Feb, 26 09:12 AM
क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रिंकू सिंहचे वडील खाचंद्र सिंह हे स्टेज-४ यकृताच्या कर्करोगाशी झुंजत होते. मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावली होती, यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. वडिलांच्या बिघडत्या प्रकृतीची माहिती मिळताच, रिंकू सिंह याला अचानक टीम इंडिया सोडून घरी परतावे लागले. खानचंद सिंह अनेक दिवसांपासून मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर होते आणि त्यांना सतत रेनल रिप्लेसमेंट थेरपी दिली जात होती.
27 Feb, 26 09:11 AM
झेडपी, पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांचे अनुक्रमे अध्यक्ष आणि सभापती निवडण्यासाठीची कार्यवाही २० मार्चच्या आधी पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच दिले आहेत. (सविस्तर वाचा)
27 Feb, 26 09:10 AM
रोहित पवार यांच्यावर भाजपाची टीका
अजितदादांच्या निधनानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत आणि रोहित पवार रोज उठून तेच तेच मुद्दे मांडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातामागचे सत्य समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार अतिशय गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. मात्र सत्य समोर आणतोय असा आव आणून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न राऊत आणि रोहित पवार करत आहेत असा घणाघात प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. (सविस्तर वाचा)
27 Feb, 26 09:09 AM
ऐरोली येथील सेक्टर ४ परिसरात फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन घराला आग
ऐरोली येथे पी ग्रुपमधील एका घरातील फ्रीजमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले. त्यानंतर कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होऊन ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. घरातील फर्निचर व इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक केंद्र अधिकारी संदेश चेन्ने, अग्निशामक प्रनेता नवनाथ गरुड, समीर परब आणि फायरमन यांच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले.