लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! अर्जात चूक झाली तरी घाबरू नका; एका कॉलवर प्रश्न सुटणार प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 08:11 IST2026-01-24T08:07:38+5:302026-01-24T08:11:20+5:30
मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा करत एका कॉलवर प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले.

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! अर्जात चूक झाली तरी घाबरू नका; एका कॉलवर प्रश्न सुटणार प्रश्न
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. योजनेचा फॉर्म भरताना किंवा e-KYC करताना तांत्रिक चुका झाल्यामुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले आहेत, त्यांच्या मदतीसाठी आता सरकारने १८१ हा विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, एका फोन कॉलवर महिलांच्या सर्व शंकांचे निरसन होणार आहे.
तक्रारींचे निवारण आता फोनवरच
अनेक महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना अनावधानाने चुकीचा पर्याय निवडला होता, ज्यामुळे त्यांच्या अर्जाची स्थिती स्थगित झाली आहे. अशा तक्रारींची दखल घेत आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, १८१ या हेल्पलाईनवर प्रशिक्षित कॉल ऑपरेटर्स तैनात करण्यात आले आहेत. हे ऑपरेटर्स महिलांना तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी थेट मार्गदर्शन करतील. यामुळे महिलांना आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार नाही.
आदिती तटकरेंची पोस्ट
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती," असं आदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अंगणवाडी सेविका करणार 'डोअर-स्टेप' पडताळणी
केवळ हेल्पलाईनच नाही, तर सरकारने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याचा निर्णयही घेतला आहे. ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत किंवा ज्यांचे e-KYC रखडले आहे, अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC ची मुदत देण्यात आली होती, मात्र तांत्रिक गोंधळामुळे अनेक बहिणी लाभापासून वंचित राहिल्या होत्या. आता या पडताळणीनंतर पात्र महिलांचा मार्ग मोकळा होणार आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ चे हप्ते उशिरा मिळाल्यामुळे विदर्भासह राज्यातील अनेक भागांत महिलांनी संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही तातडीची पावले उचलली आहेत.