"दादांच्या अकाली जाण्याने..."; उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 19:28 IST2026-01-31T19:28:12+5:302026-01-31T19:28:27+5:30
DCM Sunetra Pawar Tweet: "या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन,"

"दादांच्या अकाली जाण्याने..."; उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?
Deputy CM Sunetra Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. लोकभवनात (राजभवन) हा कार्यक्रम पार पडला. यानंतर, "दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, असे उपमुख्यमत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
शपथविधीनंतर ट्विट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या, "आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे."
"दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, असेही सुनेत्रा यांनी म्हटले आहे.
याच बरोबर, "या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.