भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 21:09 IST2026-05-11T21:03:51+5:302026-05-11T21:09:43+5:30
Indian Railway AI Ticket System: भारतीय रेल्वे आता आरक्षण प्रणालीमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Indian Railway AI Ticket System: भारतीय रेल्वेने प्रवास करणे अनेकांसाठी दिव्यच ठरते. आधी एक तर कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येतात. त्यात दोन महिने आधी तिकीट काढले आणि ते वेटिंग लिस्ट असले तरी कन्फर्म होणार की नाही, याची चिंता असते. प्रवाशांची ही समस्या दूर करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI च्या माध्यमातून प्रवाशांनी काढलेले तिकीट कन्फर्म होणार की नाही, हे समजणार आहे. यासाठी तिकीट बुकिंग यंत्रणेत मोठे बदल केले जात आहेत.
भारतीय रेल्वे केवळ ट्रेनचे आधुनिकीकरण करण्यावरच काम करत नाही, तर रेल्वे आरक्षण प्रणालीमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर व्हावा, यासाठी रेल्वे सातत्याने बदल करत आहे. असे वृत्त आहे की, ऑगस्टपासून आरक्षण प्रणालीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून, ट्रेनची यंत्रणा नवीन प्रणालीवर हस्तांतरित केल्या जाणार आहेत. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्नही सरकार करत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रणाली पूर्णपणे अद्ययावत
अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल भवन येथे झालेल्या एका बैठकीत या योजनांचा आढावा घेतला. या योजनांमुळे प्रवाशांना गैरसोय होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सध्याची रेल्वे आरक्षण प्रणाली १९८६ मध्ये सुरू करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत त्यात अनेक किरकोळ बदल करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या मते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रणाली पूर्णपणे अद्ययावत करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने २००२ साली सर्वप्रथम इंटरनेट-आधारित तिकीट बुकिंग सुरू केले. तेव्हापासून देशभरात ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता एकूण रेल्वे तिकीट मागणीपैकी सुमारे ८८ टक्के मागणी डिजिटल माध्यमांद्वारे पूर्ण केली जाते, ज्यामुळे प्रत्यक्ष तिकीट काउंटरवरील अवलंबित्व कमी झाले आहे.
रेलवन ॲपद्वारे दररोज ९.२९ लाख तिकिटे बुक केली जातात
गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेले 'रेलवन' ॲप, भारतीय रेल्वेच्या डिजिटल विस्ताराच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक बनले आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर ३५ दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. या ॲपद्वारे प्रवासी आरक्षित आणि अनारक्षित तिकिटांचे बुकिंग, रद्दीकरण आणि परतावा मिळवू शकतात. या ॲपद्वारे ट्रेनची थेट स्थिती प्लॅटफॉर्मची माहिती, ट्रेनमधील जागेची माहिती आणि रेल्वे मदत सेवांची माहिती मिळते. प्रवासी ॲपद्वारे थेट त्यांच्या जागेवर जेवणही मागवू शकतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेलवन ॲपद्वारे दररोज अंदाजे ९.२९ लाख तिकिटे बुक केली जातात, ज्यामध्ये ७.२ लाख अनारक्षित आणि २.०९ लाख आरक्षित तिकिटांचा समावेश आहे.
आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही?
रेल वन ॲपमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या नवीन वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे एआय-आधारित वेटलिस्ट कन्फर्मेशन प्रेडिक्शन सिस्टीम. हे वैशिष्ट्य प्रवाशांना त्यांच्या प्रवासापूर्वी वेटलिस्टवरील त्यांचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता किती आहे, याबद्दल माहिती देते. अधिकाऱ्यांच्या मते, या वर्षी नवीन एआय-आधारित प्रणाली सुरू केल्यापासून, अंदाजांची अचूकता ५३ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.