डाळींच्या दरात प्रचंड दरवाढ ! तूरडाळीने तर बजेट कोलमडेल; किलोमागे किती रुपयांची झाली वाढ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:19 IST2026-02-05T19:18:39+5:302026-02-05T19:19:41+5:30
Chandrapur : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या ताटातील वरण आता महागले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत असतानाच, आता डाळींच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे.

Huge hike in pulse prices! Tur dal will collapse the budget; How much has the price increased per kg?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या ताटातील वरण आता महागले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत असतानाच, आता डाळींच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. विशेषतः तूरडाळीच्या किमतीत प्रतिकिलो २० ते ३० रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
काही दिवसांपूर्वी ८० ते १०० रुपयांच्या दरम्यान मिळणारी तूरडाळ आता थेट १३० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. केवळ तूरच नव्हे, तर मूग, उडीद आणि मसूर डाळीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आवक कमी होणे आणि मागणी वाढणे, यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांना आता डाळीचा वापर जपून करावा लागत आहे.
असे आहेत डाळींचे दर (प्रतिकिलो)
डाळीचा प्रकार सहाः स्थितीतील दर (रुपये)
तूरडाळ १२० - १३०
मूगडाळ ११० - १२०
उडीद डाळ १२० - १३०
मसूर डाळ ९० - १००
हरभरा डाळ ८० - २०
सर्वसामान्यांचे ताट रिकामे ?
डाळ हा प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. मात्र, डाळींचे भाव वाढल्याने मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या ताटातून वरण गायब होण्याची भीती निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळात ही दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पालेभाज्यांपाठोपाठ आता डाळींचाही मार
आधीच अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांचे भाव वधारलेले असताना, आता डाळींनीही जोर धरला आहे. किराणा दुकानात गेलेला ग्राहक डाळींचे भाव ऐकून अर्ध्या किलोवरच समाधान मानत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
"अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे बाजारात मालाची टंचाई निर्माण झाली. नवीन माल बाजारात येण्यास अद्याप उशीर असल्याने साठवणूक केलेला माल संपत आला आहे, ज्यामुळे किमती वाढत आहेत."
- सुरेश वर्मा, व्यापारी, चंद्रपूर
"दर महिना किराणा सामानाचे बिल वाढतच चालले आहे. तूर डाळीचे भाव किलोमागे ३० रुपयांनी वाढल्याने दररोजच्या जेवनात वरण कसे बनावायचे असा प्रश्न आहे. सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे."
- संजना राऊत, गृहिणी