महाराष्ट्र 'दादा'ला उद्या अखेरचा निरोप देणार! बारामतीत होणार अजित पवारांवर अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:16 IST2026-01-28T14:15:07+5:302026-01-28T14:16:43+5:30
Ajit Pawar Funeral in Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या २९ जानेवारी रोजी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार. वाचा सविस्तर नियोजन.

महाराष्ट्र 'दादा'ला उद्या अखेरचा निरोप देणार! बारामतीत होणार अजित पवारांवर अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार
Ajit Pawar Last Rites: विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या (२९ जानेवारी २०२६) त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या बारामतीत येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्कारावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन मानवंदना दिली जाईल.
शासकीय दुखवटा म्हणजे काय? तो कधी जाहीर करण्यात येतो? जाणून घ्या, सविस्तर.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची उपस्थिती
अजित पवार यांचे केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांशी असलेले जवळचे संबंध सर्वश्रुत होते. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले असून, उद्या ते स्वतः बारामतीत येऊन पार्थिवाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा आणि देशातील इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि 'नो फ्लाय झोन' लागू करण्यात आला आहे.
बारामतीत जनसागर लोटणार
आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी पुणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो कार्यकर्ते आणि नागरिक बारामतीकडे रवाना झाले आहेत. बारामतीमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून, शहरात अत्यंत शोकाकुल वातावरण आहे.