अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांना किती अनुभव होता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 13:13 IST2026-01-28T13:12:05+5:302026-01-28T13:13:34+5:30
Ajit Pawar Death in Plane Crash: विमान अपघातात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांना किती अनुभव होता?
Ajit Pawar Death in Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अप) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे आज(दि.28) सकाळी विमानअपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामतीत लँडिंगदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमान रनवेवरून घसरून शेतात कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या भीषण अपघातात अजितदादांसह विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
विमानात कोण-कोण होते?
मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात अजितदादांसह, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, अनुभवी पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक उपस्थित होते.
वैमानिकांना किती अनुभव होता?
कॅप्टन सुमित कपूर या विमानाचे मुख्य पायलट होते. सुमित यांना अनेक वर्षांचा विमान चालवण्याचा अनुभव होता. तर, शांभवी पाठक यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स आणि एव्हिएशन सायन्स या विषयात बीएससी पदवी प्राप्त केली. त्यानंतर न्यूझीलंडमधील न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमी येथून कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेतले. 2018 ते 2019 या कालावधीत त्यांनी तेथे व्यावसायिक उड्डाणाचे (प्रोफेशनल फ्लायिंग) प्रशिक्षण पूर्ण केले. याच प्रशिक्षणादरम्यान त्यांना न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी कडून कमर्शियल पायलट लायसन्सही मिळाले.
"असे वाटते आत्ता दादांचा फोन येईल", अजित पवारांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर
विमान कोणत्या कंपनीचे होते
ज्या विमानाचा अपघात झाला, ते व्हीएसआर व्हेंचर्सच्या मालकीचे लिअरजेट 45 विमान होते. व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही दिल्लीतील एक खाजगी विमान कंपनी असून, 2011 मध्ये स्थापन झाली. विमान भाड्याने देण्याव्यतिरिक्त, ती विमान सल्लागार म्हणून देखील काम करते. कॅप्टन विजय सिंग आणि कॅप्टन रोहित सिंग या कंपनीचे मालक आहेत.
अपघात नेमका कसा झाला?
सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान हा अपघात झाला. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी मुंबईहून बारामतीला जात होते. बारामती धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला. धावपट्टीवर उतरण्याऐवजी ते जवळच्या शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचे तुकडे झाले आणि आग लागली.