'मराठवाड्यात ३ महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय, सरकारला अजून किती बळी हवेत?' काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:00 IST2026-04-28T15:00:06+5:302026-04-28T15:00:22+5:30
vijay wadettiwar News: शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

'मराठवाड्यात ३ महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय, सरकारला अजून किती बळी हवेत?' काँग्रेसचा सवाल
शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठवाड्यात अवघ्या तीन महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय. सरकारला अजून किती बळी हवेत? असा सवाल वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला आहे.
या संदर्भात सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये वडेट्टीवार यांनी लिहिले की, मराठवाड्यात अवघ्या तीन महिन्यांत २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय. कर्जाचा बोजा आणि उद्ध्वस्त झालेल्या पिकांमुळे बळीराजा हतबल झाला आहे. रक्ताचं पाणी करून जगाला पोसणारा अन्नदाता आज स्वतःच्याच शेतात फासावर लटकतोय, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
सरकारला अजून किती बळी हवेत? तुमच्या मदतीच्या घोषणा आणि योजना फक्त कागदावरच नाचत आहेत, पण शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहचायला यांना मुहूर्त मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात हे सरकार पूर्णपणे निकामी ठरलं आहे. अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.