स्वप्नवेलीचा करुण अंत! कुटुंबासमोरच कर्ता पुरुष तेरणा नदीत गडप; २८ तासांनंतर मृतदेह हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 20:17 IST2026-04-25T20:15:42+5:302026-04-25T20:17:14+5:30
आई, पत्नी आणि ५ मुलांचा आधार हरपला; तेरणा नदीकाठी कपडे धुताना घडला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग.

स्वप्नवेलीचा करुण अंत! कुटुंबासमोरच कर्ता पुरुष तेरणा नदीत गडप; २८ तासांनंतर मृतदेह हाती
सुमेध वाघमारे
तेर (जि. धाराशिव) : नदीचा तो संथ प्रवाह काळजाचा शुक्रवारी ठोका चुकवणारा ठरला. संत गोरोबाकाकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तेर नगरीत, जिथे भक्तीचा मळा फुलतो, तिथेच एका कुटुंबाचा आधार हरपला. कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेलेल्या अमर लक्ष्मण देवकुळे (४०) या तरुणाचा तेरणा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. २८ तासांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणानंतर अखेर एका खासगी यंत्रणेने अमरचा मृतदेह बाहेर काढला.
शुक्रवारची ‘ती’ दुपार देवकुळे कुटुंबासाठी घातवार ठरली. अमर आपल्या कुटुंबासह आनंदाने नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले होते. घरची कामे आटोपली आणि पाेहण्याचा मोह अनावर झाला. पोहण्यासाठी मारलेली ती एक उडी शेवटची ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अमर पाण्यात गडप झाला आणि काठावर असलेल्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. किंकाळ्या आणि आक्रोशाने तेरणा काठ हादरून गेला. शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र, तासनतास उलटूनही त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. शनिवारी दुपारपर्यंत शोध सुरूच होता, पण यश मिळत नव्हते. अखेर हतबल झालेल्या प्रशासनाने तेरणा नदीचे पाणी गेटमधून सोडून दिले. मात्र, तरीही शोध लागेना. अखेर तहसीलदार मृणाल जाधव यांनी इंदापूर येथील खासगी यंत्रणेला पाचारण केले. पुण्याचे निखिल शिवतारे आणि बनारसी चव्हाण यांनी येताच अवघ्या काही वेळात अमरचा मृतदेह शोधून काढला. कोट्यवधींचा निधी खर्च होणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन एका मृतदेहाच्या शाेधासाठी २८ तास हतबल होते, याबद्दल संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबाला धीर दिला.
नशिबाचा खेळ: चार दिवसांत दोन मृत्यू
देवकुळे कुटुंबावर जणू आभाळच फाटले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वीच या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाले होते. त्या दु:खातून सावरण्यापूर्वीच कुटुंबाचा मुख्य आधार असलेला अमर काळाच्या पडद्याआड गेला. आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा सात जणांचा भार ज्याच्या खांद्यावर होता, तो खांदाच आज निखळला आहे.