लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, जिल्ह्यात बुधवारी ४ हजार ४२७ व्यक्तींच्या चाचण्यांमध्ये ६४१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आता बाधितांचा आलेख ८६ हजार ३०२ वर पोहोचला असून, यातील ७९ हजार २३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्य:स्थितीत ५ हजार ४१७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी उपचारादरम्यान २९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत १५०८ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात २१४ पॉझिटिव्ह आढळले, तर २९१९ व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात ४२७ रुग्ण आढळले असून, दोन्ही चाचण्या मिळून ६४१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, उपचारादरम्यान २९ जणांचा मृत्यू झाला. त्यात दहा जणांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त होते. अकरा जणांना कोरोनासह अन्य व्याधी होत्या. तर आठ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी होते, असे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले.
सध्या उपचार घेत असलेल्या ५ हजार ४१७ रुग्णांपैकी ४१८ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ३४ रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. तर ३१३ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असून, ९४९ रुग्ण मध्यम परंतु, ऑक्सिजनवर आहेत. ३४४ रुग्णांमध्ये मध्यम लक्षणे असली तरी विनाऑक्सिजनवर असून ३७७७ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. ५४१७ रुग्णांपैकी ३२२१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर २१९६ रुग्ण कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात दाखल असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी दिली.
९२२ जण कोरोनामुक्तबुधवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ९२२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ८१२, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३३, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ९, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील १८, औसा, अहमदपूर ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येकी २, बाभळगाव ग्रामीण रुग्णालयातील १, कासारशिरसी येथील २, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील २२ अशा एकूण ९२२ जणांनी कोरोनावर मात केली.