"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 14:12 IST2026-04-23T13:48:21+5:302026-04-23T14:12:31+5:30
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता' या पुस्तकावरून एका व्यक्तीला धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणावरून आता नवीन वाद सुरू झाला आहे.

"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या शीर्षकावरुन प्रकाशकाला शिवीगाळ केल्याची एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची सून मेधा पानसरे यांनी गायकवाड यांना प्रत्युत्तर दिले आहे. "कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. त्यांचा विचार तुम्हाला मारता येत नाही. त्यांच्या विचारसरणीचा प्रतिवाद करणारा दुसरा तुल्यबल विचारच तुमच्यापाशी नाही", असे प्रत्युत्तर पानसरे यांनी दिले.
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
"आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, त्याचा मी तीव्र निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज हे सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरीबांचा, रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत आणि नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे नक्की शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेत आहेत? मी याचा निषेध करते, असेही मेधा पानसरे म्हणाल्या.
मेधा पानसरे म्हणाल्या, 'शिवाजी कोण होता', हे पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती छापल्या आहेत, वाटल्या गेल्या आहेत. हे पुस्तक आजही वाचले जाते. कॉम्रेड पानसरे यांनी या पुस्तकात जो विचार सांगितला आहे तो मारता येत नाही, त्यावर दुसरा तुल्यबल विचार त्यांच्यापाशी नाही.
रेकॉर्डिंग व्हायरल
प्रा. गोविंद पानसरे यांच्या सुमारे ३८ वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील भाषाशैली आणि मांडणीवर आमदार गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकेरी उल्लेख आणि इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचा आरोप त्यांनी करत, संबंधित प्रकाशकाशी थेट संपर्क साधून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले. या संभाषणातील कथित धमकीवजा भाषा सार्वजनिक झाल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले. अत्यंत खालच्या दर्जाची भाषा यात वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.