‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:58 IST2026-04-23T13:57:34+5:302026-04-23T13:58:28+5:30
या संभाषणातील कथित धमकीवजा भाषा सार्वजनिक झाल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले. अत्यंत खालच्या दर्जाची भाषा यात वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
बुलढाणा : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून उभा राहिलेला वाद आता केवळ मतभेदांच्या चौकटीत न राहता थेट राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाची ध्वनिचित्रफीत व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असून, आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तीव्र झाले आहे.
प्रा. गोविंद पानसरे यांच्या सुमारे ३८ वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील भाषाशैली आणि मांडणीवर आमदार गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकेरी उल्लेख आणि इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचा आरोप त्यांनी करत, संबंधित प्रकाशकाशी थेट संपर्क साधून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले. या संभाषणातील कथित धमकीवजा भाषा सार्वजनिक झाल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले. अत्यंत खालच्या दर्जाची भाषा यात वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, प्रकाशक प्रशांत आंबी यांनी ठामपणे प्रतिवाद करत पुस्तकाचा हेतू ऐतिहासिक अभ्यासाचा असून कोणताही अनादर करण्याचा नाही, असे स्पष्ट केले. पुस्तक १९८८ पासून सातत्याने प्रकाशित होत असल्याचे सांगत, मतभेदांचा मार्ग चर्चा आणि वाचनातूनच निघायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यात दोन टोकांचे प्रश्न उभे राहिले आहेत. ऐतिहासिक अस्मिता जपण्याच्या नावाखाली आक्रमक भूमिका कितपत योग्य, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा नेमक्या कुठे आखायच्या? सध्या हा वाद केवळ एका पुस्तकापुरता मर्यादित न राहता, राजकीय संस्कृती, सार्वजनिक संवादाची पातळी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांनाही भिडताना दिसत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ आक्रमक
या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेत आमदारांच्या भाषाशैलीवर जोरदार टीका केली. लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची भाषा वापरली जाणे ही चिंताजनक बाब असल्याचे नमूद करत, प्रकाशकाला तातडीने संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे हा वाद सरळ सत्ताधारी-विरोधक संघर्षात बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान बुलढाण्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आ. संजय गायकवाड यांनी उचलला असल्याचा आरोपही या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केला आहे.
शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही- गायकवाड
दरम्यान, आमदार गायकवाड यांनी आपले स्पष्टीकरण देताना व्हायरल ऑडिओ संदर्भाबाहेर सादर केल्याचा दावा केला असला, तरी “शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही” या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे त्यांंनी म्हंटले आहे.