Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी झाला होता लढा

By संदीप आडनाईक | Updated: May 14, 2026 14:15 IST2026-05-14T14:14:33+5:302026-05-14T14:15:21+5:30

अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहासावर नवा प्रकाश

There was a fight for the release of Chhatrapati Sambhaji Maharaj | Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी झाला होता लढा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी झाला होता लढा

संदीप आडनाईक

कोल्हापूर : मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर त्यांना सोडवण्याचा प्रयत्न झाला नव्हता, अशी इतिहासातील समजूत आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे त्यांच्या सुटकेसाठी लढा झाल्याचे संदर्भ स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे सल्लागार आणि इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी पुढे आणले आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाचा सरदार शेख निजाम ऊर्फ मुकर्रबखान याने इ. स. १६८९ मध्ये संगमेश्वर येथे पकडून बहादूरगड (आताचे धर्मवीरगड, मौजे पेडगाव, ता. श्रीगोंदा) येथे नेले. त्यांना लवकर मिरज प्रांतात आणण्यासाठी कोल्हापूरमार्गे न नेता वाघबीळ, भेडसगावमार्गे शिराळ्यास आणले. एक मुक्काम करून पेठमार्गे तो पुढे रवाना झाल्याचे संदर्भ आहेत. शेखची छावणी कोल्हापूरला असली, तरी अंमल संभाजीराजांचा होता; त्यामुळे धोका न पत्करता शेख याने ही आडवाट पकडली;

परंतु त्याच्या २५ हजारांच्या सैन्याला बत्तीस शिराळे येथील तुळाजी निकम देसाई आणि अप्पाजी दीक्षित यांची २००-२५० ची तुकडी सामोरी गेली. महाशिवरात्रीच्या आधी चार-पाच दिवस शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरून संभाजीराजांना सोडविण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला; पण ते शेख निजाम याच्या तावडीत सापडले. त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला.

अप्पाजींच्या वंशजाला जमीन इनाम

ही घटना नंतर राजाराम महाराजांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी शिराळ्याजवळील कणदूर गावी अप्पाजींच्या वंशजाला जमीन इनाम दिली, ती अद्यापही या कुटुंबाकडे आहे, याबाबत त्यांचे १० वे वंशज श्रीकृष्ण रघुनाथ दीक्षित यांच्याकडे दाखले आहेत.

जुन्या नोंदी

संभाजीकालीन पत्रसार संग्रहातील (१६०२ ते १६१०) नोंदीनुसार तुळाजी निकम देसाई (देशमुख) बत्तीस शिराळे येथील संभाजीराजांचे अंमलदार होते. त्यांनीच हा लढा दिल्याचा वस्तुस्थितीजन्य पुरावा संशोधकांना मिळाला आहे. १८३४ च्या इनाम कलेक्शनमध्ये यासंदर्भात काही पुरावे सापडले आहेत.

नमुने तपासणीसाठी पुराभिलेखागाराकडे

कोडोली येथील इतिहास अभ्यासक प्रशांत देशमुख यांनी सहकारी अभ्यासक अरविंद भोसले यांच्या मदतीने दत्ताजी नलावडे यांनी शिराळ्यातील भुईकोट किल्ल्याची पाहणी केली आहे. तेथे तीन वीरगळ आढळल्याची माहिती त्यांनी दिली. माती आणि दगडांचे नमुने तपासणीसाठी पुराभिलेखागाराकडे पाठविले आहेत.

Web Title : छत्रपति संभाजी महाराज की रिहाई के लिए लड़ाई: ऐतिहासिक प्रमाण।

Web Summary : छत्रपति संभाजी महाराज को छुड़ाने के लिए बत्तीस शिराला में लड़ाई लड़ी गई। औरंगजेब की सेना के खिलाफ तुलाजी निकम देसाई और अप्पाजी दीक्षित ने लड़ाई का नेतृत्व किया, लेकिन असफल रहे। राजाराम महाराज ने दीक्षित के परिवार को जमीन से पुरस्कृत किया।

Web Title : Battle fought for Chhatrapati Sambhaji Maharaj's release: Historical evidence.

Web Summary : A battle was fought in Batis Shirala to free Chhatrapati Sambhaji Maharaj. Tulaji Nikam Desai and Appaji Dixit led the fight against Aurangzeb's army, but failed. Rajaram Maharaj rewarded Dixit's family with land.