पुण्याच्या विद्यार्थ्याचा काळम्मावाडी येथील काळोखा डोहात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:23 IST2026-04-30T15:23:08+5:302026-04-30T15:23:35+5:30
काळम्मावाडी नदीपात्रात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

पुण्याच्या विद्यार्थ्याचा काळम्मावाडी येथील काळोखा डोहात बुडून मृत्यू
राधानगरी - काळम्मावाडी नदीपात्रात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. स्वराज संदीप शिंदे (वय १६) रा. इंद्रायणीनगर भोसरी पुणे, मूळ गाव ओवळी ता. चिपळून जि रत्नागिरी. असे मृताचे नाव आहे. अधिक माहिती अशी स्वराज शिंदे हा विद्यार्थी नुकताच दहावीची परीक्षा देऊन सुट्टीसाठी ठाणापुरे, जि सांगली येथील आपल्या मामाच्या गावी आल्यानंतर बुधवार सकाळी सांगलीहुन मामा व त्यांच्या मित्रांसमवेत काळम्मावाडी येथे पर्यटनासाठी आला होता.
नदीपात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने स्वराज येथील काळोखा डोहात बुडाला. स्वराज बुडाला आहे हे समजताच स्वराज्याच्या मामाने राधानगरी पोलिसात तात्काळ या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच जिल्हा व्यवस्थापन विभाग व राधानगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक बचाव पथकाने बुधवारी दुपारी शोधमोहीम सुरू केली. पण सायंकाळ झाल्याने ही शोध मोहीम थांबवली. गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता सकाळी दहाच्या दरम्यान स्वराज्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. अवघ्या १६ वर्षाचा स्वराजच्या अशा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.