कल्याण - मुंबईच्या मुक्त मार्गाच्या (फ्री वे) धर्तीवर उभारण्यात येत असलेला आणि नवी मुंबई ते डोंबिवली अंतर काही मिनिटांवर आणणाऱ्या ऐरोली काटई मुक्त मार्गाच्या उभारणीतील कोंडी लवकरच फुटणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोटीस जाहीर केले आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने साकारण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटात पार करता येणार आहे.
कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ऐरोली ते काटई फ्री वे ची निर्मिती केली जाते आहे. या मार्गात ऐरोली भागातील खाडीपासून या मार्गाची सुरूवात होते. तर हा मार्ग डोंबिवलीजवळी काटई चौकात येऊन उतरणार आहे. हा मार्ग पूर्णपणे उन्नत असून हा मार्ग शिळफाटा येथील डोंगरातून ऐरोलीला जातो. यातील बोगदा तयार असून ऐरोली दिशेच्या बहुतांश भागाचे काम पूर्ण झाले आहे. तर मुंब्रा वाय जंक्शन पुलावरून या रस्त्याची मार्गिका जाते. बोगदा आणि बोगद्यातून येणारा मार्ग मुंब्रा वाय जंक्शन पुलावर येऊन थांबला आहे.
पुढच्या टप्प्यातील कामासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या मार्गाचे काम रखडले होते. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या या भागातील भूसंपादन करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. शिंदे अनेक प्रयत्नशील होते. अखेर या मार्गात आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नोटीस जाहीर करण्यात आले आहे. यात आवश्यक जागेचा तपशील आणि गावांच्या नावांची माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला ही जागा खुली आहे, त्यामुळे कोणत्याही भूखंडधारकाचे यात विस्थापन होणार नाही. तसेच पुनर्वसन किंवा पुनर्वसाहतीचाही प्रश्न उद्भवत नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास ऐरोली ते काटई मार्गाच्या उभारणीला गती मिळणार आहे.
ऐरोली-कटाई नाका कॉरिडॉर हा प्रकल्प कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक घडामोडींसाठी एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून काम करेल, तसेच लाखो लोकांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान करेल.
१८.३३ हेक्टर जागा आवश्यक
ऐरोली - काटई रस्त्याच्या उभारणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याबाबत नुकतेच नोटीस जाहीर करत माहिती देण्यात आली आहे. ऐरोली - काटई मुक्त मार्गाच्या उर्वरित भागाच्या उभारणीसाठी १८.३३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. यामध्ये देसाई गावातील १०.३ हेक्टर, डावले ४.९२ हेक्टर, शीळ २.१२ हेक्टर, कौसा ०.५७ हेक्टर, डोखाळ ०.४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.
प्रकल्पाचा आढावा
टप्पा १, २आणि तीनची एकूण लांबी : सुमारे १२.७१ किमी
संरचना : ३ ३ लेन कॅरेजवे
बोगदा : दुहेरी बोगदा ( तिहेरी ३ वाहतूक लेन १ आपत्कालीन मार्ग)
बोगदा तंत्रज्ञान : न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड – ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग, जटिल भूगर्भीय परिस्थितीसाठी उपयुक्त
बोगद्यामधील सुविधा
वायुवीजन प्रणाली
अग्निशमन प्रणाली
उच्च-दाब वॉटर मिस्ट प्रणाली
बुद्धिमान प्रकाश व्यवस्था
व्हेरेबल मेसेज सायनेज
टप्पा १: बोगदा आणि उन्नत मार्गठाणे–बेलापूर रोड ते एनएच-४
हा टप्पा कॉरिडॉरचा मुख्य आधार असून ऐरोली आणि एनएच-४ यांना मुंब्रा येथे थेट जोडतो.
एकूण लांबी : ३.४३ किमी
दुहेरी बोगदा :
लांबी : १.६९ किमी (प्रत्येक ट्यूबमध्ये ३ वाहतूक लेन १ रिफ्यूज लेन)
रुंदी : १७.५० मीटर (प्रत्येक ट्यूब)
नागरी कामे : ९२% पूर्ण
उन्नत मार्ग :
लांबी : ०.९४ किमी
संरचना : ३ ३ लेन
बोगद्याबरोबरच कार्यान्वित केला जाईल
प्रकाश, वायुवीजन आणि अग्निशमन यांसारख्या महत्त्वाच्या प्रणालींची बसवणी अंतिम टप्प्यात असून या नागरी कामांनंतर लवकरच पूर्ण होईल.
या टप्प्यामुळे महापे, शिळफाटा आणि कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून एनएच-४ अखंड आणि निर्बाध जोड मिळेल.
टप्पा २: उन्नत मार्ग ऐरोली ते ठाणे–बेलापूर रोड
लांबी : २.५७ किमी
मुख्य व्हायाडक्ट : ३ ३ लेन
रॅम्प्स : ऐरोली–मुलुंड रोडवर ३-लेन अप व डाउन रॅम्प्स
प्रगती : १००% पूर्ण
हा टप्पा टप्पा १ सोबतच कार्यान्वित केला जाणार असून बोगदा आणि संबंधित रॅम्प्ससह अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.कार्य सुरू झाल्यानंतर मुलुंड–ऐरोली ब्रिज आणि मुंब्रा यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होईल.
टप्पा ३: एनएच-४ ते कटाई नाका कल्याण–शिळ रोड कॉरिडॉर
लांबी : सुमारे ६.७१ किमी (पूर्णपणे उन्नत मार्ग)
मुख्य व्हायाडक्ट : ३ ३ लेन
सेवा रस्ते : दोन्ही बाजूंना २ २ लेन
प्रगती : सुमारे १०%
दोन ठिकाणी अप व डाउन रॅम्प्स
पूर्णता लक्ष्य : ऑक्टोबर २०२८
हा अंतिम टप्पा राष्ट्रीय महामार्ग (NH-04) पासून कटाई नाका पर्यंत विस्तार करत संपूर्ण प्रादेशिक संपर्क साखळी पूर्ण करेल.
मुख्य वैशिष्ट्ये
पूर्णपणे उन्नत हाय-स्पीड कॉरिडॉर
धोरणात्मक प्रवेश/निर्गम रॅम्प्स:
दिवा–शिळ रोड
कटाई नाका जंक्शन
कटाई नाका–बदलापूर रोड
परिवर्तनात्मक परिणाम
२०२८ मध्ये टप्पा III पूर्ण झाल्यानंतर, ऐरोली–काटई नाका कॉरिडॉर हा अखंड, प्रवेश-नियंत्रित उच्च-वेगवान मार्गिका म्हणून कार्य करेल आणि लक्षणीय फायदे प्रदान करेल:
अंतरात बचत
मुलुंड ते कटाई नाका दरम्यान सुमारे ७–८ किमी अंतराची बचत
वेळेत बचत
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ३०–४५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा
वाहतूक कोंडी कमी
खालील मार्गांवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल:
ऐरोलीतील अंतर्गत रस्ते
ठाणे–बेलापूर रोड
महापे रोड
शिळफाटा जंक्शन
कल्याण फाटा (NH-04)
कल्याण–शिळ रोड
प्रादेशिक संपर्क वृद्धी
प्रमुख निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांना थेट जोड
मुंबई आणि एमएमआरमधील उदयोन्मुख विकास केंद्रांदरम्यान अधिक मजबूत संपर्क व्यवस्था.
Web Summary : The Airoli-Katai Freeway construction restarts soon as land acquisition begins. This project will reduce travel time between Navi Mumbai and Dombivli to just 15 minutes, boosting regional connectivity and economic growth significantly upon completion.
Web Summary : ऐरोली-कटाई फ्रीवे का निर्माण भूमि अधिग्रहण शुरू होने के साथ ही जल्द ही फिर से शुरू होगा। यह परियोजना नवी मुंबई और डोंबिवली के बीच यात्रा के समय को घटाकर केवल 15 मिनट कर देगी, जिससे क्षेत्रीय कनेक्टिविटी और आर्थिक विकास को बढ़ावा मिलेगा।