भिवंडी राजनोली ते कल्याण दुर्गाडी उन्नत मार्गासह मेट्रो रेल्वेच्या कामाची निविदा २ महिन्यात काढली जाणार
By मुरलीधर भवार | Updated: April 23, 2026 18:11 IST2026-04-23T18:10:31+5:302026-04-23T18:11:00+5:30
दुर्गाडी-आधारवाडी-खडकपाडा- नेताजी चौक ते कल्याण स्टेशन; शिंदे सेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती

भिवंडी राजनोली ते कल्याण दुर्गाडी उन्नत मार्गासह मेट्रो रेल्वेच्या कामाची निविदा २ महिन्यात काढली जाणार
- मुरलीधर भवार
कल्याण : ठाणे-भिवंडी-कल्याणमेट्रो मार्गातील राजनोली ते कल्याण दरम्यान उन्नत मार्गासह मेट्रो रेल्वेच्या सुधारीत कामाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. या मार्गाच्या कामासाठी येत्या २ महिन्यात निविदा काढली जाणार आहे. हे काम येत्या २ वर्षात मार्गी लागणार असल्याची माहिती शिंदे सेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला आहे.
ठाणे-भिवंडी -कल्याण मेट्रो रेल्वेच्या कामाला २०१६ साली मंजूरी देण्यात आली हाेती. ही मंजूरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या कामाचा शुभारंभ डिसेंबर २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र प्रकल्पाच्या मंजूरीपासूनच शिंदे सेनेचे शहर प्रमुख पाटील यांनी ही मेट्रो रेल्वे कल्याण दुर्गाडी चौकातून थेट कल्याण बाजार समितीपर्यंत न नेता ती खडकपाडा मार्गे बाजार समितीकडे नेण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा पाटील यांनी लावून धरला होता. त्यांच्या मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारात घेतली. ही मेट्रो रेल्वे आत्ता कल्याण दुर्गाडी ते आधारवाडी-खडकपाडा- नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, शिवाजी चौक मार्गे कल्याण बाजार समितीपर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर कल्याण बोईर वाडी ते उल्हासनगर असा या मेट्रोचा विस्तार राहणार आहे. राजनोली ते कल्याण दुर्गाडी उन्नत मार्गासह ही मेट्रो रेल्वे धावणार आहे.
ठाणे ते भिवंडीतील धामणकर नाका पर्यंत मेट्राेचे काम मार्गी लागले आहे. धामणकर नाका ते काही परिसरात ही मेट्रो भूमिगत असणार आहे. धामणकर नाका -राजनोली-कल्याण दुर्गाडी- कल्याण खडकपाडा मार्गे कल्याण स्टेशन अशी मेट्रो मार्गाची रचना आहे. त्यात १७ मेट्रो रेल्वे स्थानके आहेत.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेसाठी यापूर्वी ८ हजार ४१६ कोटी रुपये खर्च होणार होता. आत्ता उन्नत मार्गासह मेट्रो प्रकल्प हाती घेतला जाणार असल्याने त्यात १ हजार ४२७ कोटी रुपयांचा वाढीव खर्च होणार आहे. हा खर्च धरुन आत्ता एकूण ९ हजार ८४३ कोटी रुपये खर्चास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.
मेट्रोचे जाळे कसे ?
ठाणे-भिवंडी-कल्याण, कल्याण-तळोजा, तळोजा -नवी मुंबई, नवी मुंबई-शीळफाटा, शीळफाटा-तळोजा, शीळफाटा- मुब्रा मार्गे ठाणे असे मेट्रोचे जाळे भविष्यात तयार होणार आहे. दिवा पनवेल या मार्गावरील रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. तिथे उपनगरीय रेल्वे सेवा नाही. तर भिवंडी रोड आणि खारबाव हे दिवा वसई मार्गावरील रेल्वे स्थानक भिवंडी शहरापासून दूर आहे. भिवंडी हे शहर मेट्रो रेल्वेशी जोडले जाणार आहे. त्यामुळे भिवंडीची कनेक्टीव्हीटी प्रबळ होणार आहे. भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, तळोजा ही शहरे उद्योगनगरी आहेत. या उद्योगनगरीत काम करणारे कामगारांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे.