कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई २१ लाखांचा १०७ किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 19:24 IST2026-05-05T19:24:21+5:302026-05-05T19:24:43+5:30
३ तस्करांना सापळा रचत पोलिसांनी ठाेकल्या बेड्या, तिघेही सराईत गुन्हेगार

कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई २१ लाखांचा १०७ किलो गांजा जप्त
कल्याण: कल्याणअमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २१ लाख ४० हजार रुपये किमतीचा १०७ किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी ३ तस्करांना अटक केली आहे. वसीम खान उर्फ पिला, दिनेश कुमार आणि मोहित वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या पथकाने मोठ्या शीताफिने या तिघांनाही अटक केली.
हे तिघेही सराईत गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वीही अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा गांजा कुठून आणला ? कोणाला विकला जाणार होता ? या मागील मुख्य सूत्रधार कोण आहे ? याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची खरेदी-विक्री होणार असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड आणि उपनिरीक्षक जितेंद्र ठोके यांच्या पथकाने वाडेघर परिसरातील वाडेकर डम्पिंग ग्राउंडजवळ सापळा रचला. तेथे संशयास्पद हालचाल करणारे ३ जण आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. त्यांच्या जवळ हिरव्या-पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. चौकशीत आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत धाडसी कारवाई केली. तिघांनाही ताब्यात घेतले. तपासात त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला.