आता देशभरातील सोन्याचा साठा वापरात काढण्याची संधी, मोदींच्या आवाहनानंतरही सुवर्णनगरीत खरेदीचा उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:29 IST2026-05-12T12:27:30+5:302026-05-12T12:29:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर सुवर्णनगरी जळगावमध्ये ११ मे रोजी सुवर्ण बाजारात फारसा परिणाम जाणवला नाही.

आता देशभरातील सोन्याचा साठा वापरात काढण्याची संधी, मोदींच्या आवाहनानंतरही सुवर्णनगरीत खरेदीचा उत्साह
जळगाव: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर सुवर्णनगरी जळगाव येथे सोने खरेदीवर परिणाम न होता खरेदीचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. दरम्यान, देशात सोन्याचा मोठ्या प्रमाणात साठा असून विदेशात पैसा जाऊ द्यायचा नसल्यास देशातील साठा वापरात काढण्याची ही संधी आहे, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
देशहितासाठी सोने व इंधन खरेदी यात काटकसर करण्याचे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी १० मे रोजी केले. त्यानंतर ११ मे रोजी सुवर्ण बाजारात फारसा परिणाम जाणवला नाही. सध्या लग्नसराई असल्याने उलाढाल कायम असल्याचे बाजारपेठेत दिसून आले.
गुंतवणूक म्हणून होणाऱ्या खरेदीकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन केवळ गुंतवणूक म्हणून होणाऱ्या खरेदीसाठी असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांकडून काय निर्णय होऊ शकतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
देशहितासाठी आवाहन पाळा...
पंतप्रधानांनी देशहितासाठी वर्षभर सोने खरेदी करू नये, असे जे आवाहन केले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. एक जबाबदार नागरिक म्हणून व्यापारी, कारागीर, सुवर्णकार आणि सामान्य जनतेने या आवाहनाचे पालन करणे आवश्यक आहे, असे देखील काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
भाव कमी होण्याचे संकेत
सोने खरेदी थांबविण्याचे आवाहन केले असल्याने गुंतवणूकदारांनी खरेदी कमी केल्यास मागणी कमी होऊन सोन्याचे भावदेखील कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
चांदी ३ हजार रुपयांनी वधारली
सोमवारी सोन्याच्या भावावर मोठा परिणाम झाला नाही. केवळ २०० रुपयांनी भाव कमी होऊन प्रति दहा ग्रॅम एक लाख ५१ हजार रुपयांवर आले. दुसरीकडे चांदीच्या भावात तीन हजार रुपयांनी वाढ होऊन प्रति किलो दोन लाख ६३ हजार रुपयांवर पोहचल्याचे सांगण्यात येत आहे.
सोने खरेदी वर्षभर थांबविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले असले तरी नियमित वापरासाठी किंवा लग्नसराईसाठी दागिने खरेदी सुरूच राहील. अधिकमासानंतर पुन्हा ती सुरू होईल. त्यामुळे परिणाम होणार नाही.
-सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक
देशातील लाखो सुवर्णकार, कारागीर, छोटे व्यावसायिकांचे भविष्य या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे कोणतेही आवाहन किंवा निर्णय घेताना देशहिताबरोबरच रोजगार, उद्योग आणि सामान्य कुटुंबांच्या उपजीविकेचाही चार होणे आवश्यक आहे.
किशोरकुमार जिनदत्त शहा, चेअरमन चंदुकाका सराफ
नियमनबद्ध वापर गरजेचा
भारतात आधीच हजारो टन निष्क्रिय घरगुती सोने उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ मागणी कमी करणे हा उपाय नसून, पारदर्शक आणि नियमनबद्ध (जीएमएस) द्वारे या सोन्याचा वापर वाढवणे अधिक परिणामकारक ठरू शकणार आहे.