"अमेरिकेची इच्छा नाही की...!"; भारताचं नाव घेत इराणचा मोठा दावा; US ला नेमकी भीती कशाची? स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:57 IST2026-03-04T12:56:53+5:302026-03-04T12:57:40+5:30
पाश्चिमात्य देशांच्या अंदाजापेक्षा इराण अधिक शक्तीने लढा देत असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. यामुळे हे युद्ध आता अपेक्षेपेक्षा अधिक काळ खेचले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

"अमेरिकेची इच्छा नाही की...!"; भारताचं नाव घेत इराणचा मोठा दावा; US ला नेमकी भीती कशाची? स्पष्टच सांगितलं
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध पेटलेले असतानाच आता इराणने मोठा दावा करत अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे विशेष प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी अमेरिकेच्या जागतिक धोरणांवर सडकून टीका केली. अमेरिका आपले जागतिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक जगभरात युद्धाचा खेळ खेळत आहे. इराणसोबतच्या या युद्धाचा मुख्य उद्देश भारत आणि चीनला शक्तिशाली होण्यापासून रोखणे हा आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
भारत आणि चीनला रोखण्यासाठी युद्धाचा खेळ -
एएनआयशी बोलताना इलाही म्हणाले, "नजीकच्या काळात भारत, चीन, रशिया आणि अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली देश असतील. मात्र, अमेरिकेला सत्तेमध्ये कुणाचीही भागीदारी नको आहे. भारत अथवा चीन महाशक्ती म्हणून उदयाला येऊ नयेत, यासाठीच अमेरिका, अशा प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत आहे. जेणेकरून जगावर केवळ अमेरिकेचेच वर्चस्व कायम राहील."
युद्धाची सुरुवात इराणने नव्हे तर अमेरिका इस्रायलने केली -
दरम्यान, इराण केवळ आपल्या नागरिकांचे आणि भूभागाचे रक्षण करत आहे. अमेरिकेने हे युद्ध सुरू केले असल्याने, ते संपवण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे, असा पुनरुच्चार इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांनी केला आहे.
दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणच्या अणू सुविधा आणि लष्करी तळांवर समन्वित हल्ले चढवले. यात इराणचे काही उच्चपदस्थ नेतेही मारले गेले. इराणनेही आखातातील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने प्रत्युत्तर दिले. यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. पाश्चिमात्य देशांच्या अंदाजापेक्षा इराण अधिक शक्तीने लढा देत असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. यामुळे हे युद्ध आता अपेक्षेपेक्षा अधिक काळ खेचले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.