'रात्री १ वाजता फोन केला तरी...'; बुर्ज खलिफाच्या निर्मात्यांनी सांगितलं भारतीयांना नोकरी देण्याचं 'खास' कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:34 IST2026-05-07T16:34:03+5:302026-05-07T16:34:48+5:30
बुर्ज खलिफाच्या मालकाने सांगितलं भारतीय टॅलेंटचं असं गुपित की जग थक्क होईल!

'रात्री १ वाजता फोन केला तरी...'; बुर्ज खलिफाच्या निर्मात्यांनी सांगितलं भारतीयांना नोकरी देण्याचं 'खास' कारण
Emaar Hiring Strategy: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा उभारणारे आणि एमार प्रॉपर्टीजचे संस्थापक मोहम्मद अलाब्बार यांनी भारतीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे. भारतीय कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि कामाप्रती असलेली जिद्द जगात सर्वश्रेष्ठ आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला अनुभव मांडला.
अबू धाबी येथे आयोजित मेक इट इन द एमिरेट्स २०२६ या शिखर परिषदेत अलाब्बार बोलत होते. यावेळी त्यांनी आपली कंपनी भारतीय टॅलेंटला प्राधान्य का देते, याचे कारण स्पष्ट केले.
'टॅलेंटपेक्षा मेहनत श्रेष्ठ'
मोहम्मद अलाब्बार यांनी भारतीयांच्या गुणवत्तेवर भाष्य करताना सांगितले की, व्यवसायातील यश हे केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसते, तर ते सातत्य आणि परिश्रमावर अवलंबून असते. त्यांनी स्वतःचे उदाहरण देताना म्हटले की, "माझा आयक्यू सरासरी आहे, पण माझी मेहनत जगातील सर्वोत्तम आहे. मी कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतो." त्यांच्या मते, जर हुशार माणसाने मेहनत केली नाही, तर कष्टाळू माणूस त्या हुशार माणसालाही मागे टाकतो.
रात्री १ वाजताचा 'तो' कॉल अन् भारतीयांची जिद्द
भारतीय कर्मचाऱ्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य सांगताना अलाब्बार म्हणाले, "मला भारतीयांना कामावर ठेवायला का आवडते? कारण ते कामासाठी कमालीचे समर्पित आहेत. जर मी त्यांना रात्री एक वाजताही फोन केला, तर ते उत्तर देण्यासाठी उपलब्ध असतात. कामाप्रती असलेली ही जबाबदारीची जाणीवच भारतीयांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते."
भारत सर्वात मोठी आणि स्थिर बाजारपेठ
फक्त कर्मचारीच नाही, तर जागतिक बाजारपेठ म्हणूनही अलाब्बार यांनी भारताला पसंती दिली. "आजच्या घडीला भारतापेक्षा मोठी, स्थिर आणि वेगाने प्रगती करणारी दुसरी कोणती बाजारपेठ आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे," असे ते म्हणाले.
संकटातील मजबुती महत्त्वाची
२००८ ची जागतिक मंदी आणि कोरोना महामारीचा उल्लेख करत अलाब्बार यांनी सांगितले की, अनिश्चित वातावरणात केवळ त्याच कंपन्या टिकतात ज्या सतर्क असतात. भारतीय व्यावसायिकांची नवीन तंत्रज्ञान शिकण्याची ओढ आणि कठीण काळात खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती, यामुळे दुबईपासून युरोपपर्यंतच्या एमारच्या प्रत्येक मोठ्या प्रकल्पात भारतीयांचा बोलबाला असल्याचे त्यांनी मान्य केले.