टॅरिफवर कोर्टाचा निर्णय, India-US डीलवर होणार परिणाम?; ट्रम्प यांनी भारताबाबत केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 08:51 IST2026-02-21T08:51:11+5:302026-02-21T08:51:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान व्यक्ती आहेत. पण ते अमेरिकेविरुद्ध खूप हुशार होते. भारत आम्हाला लुटत होता असं ट्रम्प यांनी म्हटलं.

टॅरिफवर कोर्टाचा निर्णय, India-US डीलवर होणार परिणाम?; ट्रम्प यांनी भारताबाबत केला मोठा दावा
वॉश्गिंटन - अमेरिकन सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयावर मोठा निर्णय दिला आहे. ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ कोर्टाने बेकायदेशीर ठरवले आहे. त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अमेरिकेच्या धोरणांवर प्रभाव पडणार आहे. परंतु याचा भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर काही परिणाम होणार नाही असं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाने ६-३ या बहुमताने ट्रम्प यांच्याकडून लावण्यात आलेल्या जागतिक टॅरिफला बेकायदेशीर ठरवले. त्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
१९७७ च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती अधिनियम(IEEPA) अंतर्गत राष्ट्रपतींना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही असं कोर्टाने सांगितले. कोर्टाच्या या निर्णयानंतर पत्रकार परिषद घेत ट्रम्प यांनी न्यायाधीशांच्या भूमिकांवर प्रश्न उभे केले. काही न्यायाधीश परदेशी शक्तींसमोर वाकले आहेत असा आरोप त्यांनी केला. जेव्हा पत्रकारांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर ट्रम्प यांना प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले की, भारतासोबत झालेल्या करारानुसार ते टॅरिफ देतील. आधी जी स्थिती होती, त्यापेक्षा हे उलट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान व्यक्ती आहेत. पण ते अमेरिकेविरुद्ध खूप हुशार होते. भारत आम्हाला लुटत होता. आता आम्ही एक निष्पक्ष करार केला आहे. आम्ही त्यांना टॅरिफ देत नाही पण ते आम्हाला देत आहेत. आम्ही थोडे बदलले आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं.
तसेच माझे आणि पंतप्रधान मोदी यांचं नाते जबरदस्त आहे. मला वाटते भारतासोबत माझे संबंध खूप चांगले आहेत आणि आम्ही भारतासोबत व्यापार करत आहोत. भारत रशियापासून बाहेर आला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत होता आणि माझ्या सांगण्याने ते खूप दूर झालेत कारण आम्हाला रशिया-युक्रेन युद्ध संपवायचे आहे. ज्यात दर महिन्याला २५ हजार लोक मारले जातायेत असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
भारत-पाक युद्धविरामाचा पुन्हा दावा
दरम्यान, मागील वर्षी टॅरिफचा वापर करत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी रोखले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होते. १० विमाने पाडली गेली होती. हे युद्ध कदाचित अणु युद्धात बदलले असते. मी दोन्ही देशांशी संवाद साधला. त्यांना म्हटलं, तुम्हाला लढायचे असेल तर लढा, परंतु तुम्ही अमेरिकेसोबत व्यापार करू शकणार नाही. मी दोन्ही देशांना २०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि आम्ही शांतता करार केल्याचे सांगितले. त्याशिवाय पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गाझा पीस बोर्डाच्या बैठकीत ट्रम्प यांनी ३.५ कोटी जनतेचा जीव वाचवला असं म्हटल्याचीही आठवण ट्रम्प यांनी करून दिली.