चाळिशीनंतर वाढतो किडनी आजारांचा धोका, पाहा किडनींची काळजी कशी घ्याल आणि ठेवाल मजबूत....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:18 IST2026-05-12T14:05:36+5:302026-05-12T14:18:23+5:30
Kidney Disease : एका अभ्यासानुसार, क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) हा अकाली मृत्यू झपाट्याने वाढणाऱ्या कारणांपैकी एक बनत आहे.

चाळिशीनंतर वाढतो किडनी आजारांचा धोका, पाहा किडनींची काळजी कशी घ्याल आणि ठेवाल मजबूत....
Kidney Disease : वय वाढत जातं तसं शरीरात हळूहळू बदल होऊ लागतात. मात्र, अनेकदा आपण या बदलांकडे दुर्लक्ष करतो. खासकरून वयाच्या चाळीशीनंतर किडनीच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. डॉक्टरांच्या मते, या वयानंतर किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. चिंतेची बाब म्हणजे किडनीसंबंधित आजार सुरुवातीला फारसे लक्षण दाखवत नाहीत आणि समस्या लक्षात येईपर्यंत जास्त नुकसान झालेलं असू शकतं. त्यामुळे तज्ज्ञ आता ४० वयानंतर किडनीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.
एका अभ्यासानुसार, क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) हा अकाली मृत्यू झपाट्याने वाढणाऱ्या कारणांपैकी एक बनत आहे. ही फार कमी लोकांना होणारी समस्या नसून, वेगाने वाढणारा गंभीर आरोग्यविषयक धोका बनला आहे. जगभरातील डॉक्टर याबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
किडनीवर धोका का वाढतो?
डॉक्टरांच्या मते, वाढत्या वयानुसार हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढतात, ज्यांचा परिणाम किडनीवर होतो. याशिवाय कमी पाणी पिणे, जास्त मीठ खाणं, फास्ट फूड आणि पेनकिलर औषधांचा अति वापरही किडनीसाठी हानिकारक ठरू शकतो. अनेकांना वारंवार लघवी रोखून ठेवण्याची सवय असते, त्यामुळे संसर्ग आणि इतर समस्या वाढण्याचा धोका निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते, अशा छोट्या-छोट्या सवयी हळूहळू किडनी कमकुवत करू शकतात.
ही लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नका
किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे सामान्य वाटू शकतात. उदाहरणार्थ सतत थकवा जाणवणे, पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणे, वारंवार लघवी लागणे किंवा लघवीच्या रंगात बदल होणे. काही लोकांना रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागतं, पण ते वयाचा परिणाम समजून दुर्लक्ष करतात. डॉक्टरांच्या मते, शरीर सतत असे संकेत देत असेल तर त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार सुरू झाल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतात.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावं?
तज्ज्ञांच्या मते, किडनी निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली सर्वात महत्त्वाची आहे.
दररोज पुरेसे पाणी प्या, जेणेकरून शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत होईल.
आहारात मीठ आणि जास्त प्रोसेस्ड फूड कमी करा.
रोज हलका व्यायाम किंवा चालण्याची सवय लावा.
गरज नसताना वारंवार वेदनाशामक औषधे घेणे टाळा, कारण त्याचा किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
वेळेवर तपासणी करणं अत्यंत गरजेचं
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वयाच्या ४० वयानंतर वर्षातून किमान एकदा तरी किडनीची तपासणी करणे आवश्यक आहे. खासकरून ज्यांना डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर किंवा कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास आहे, त्यांनी अधिक सतर्क राहावे.
साध्या ब्लड आणि युरिन टेस्टद्वारे किडनीची स्थिती समजू शकते. डॉक्टरांच्या मते, वेळेत काळजी घेतल्यास किडनीसंबंधित अनेक गंभीर आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. छोटीशी काळजी भविष्यातील मोठ्या समस्यांपासून वाचवू शकते.