महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत आता सर्वांना उपचाराचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:14+5:30
आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार कोरोनाबाधित रूग्ण तसेच कोरोनाची लागण नसलेल्या राज्यातील १२ कोटी नागरिकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. राज्यातील शासकीय व पालिका रुग्णालयांचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचे निश्चित केले आहे.
आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार कोरोनाबाधित रूग्ण तसेच कोरोनाची लागण नसलेल्या राज्यातील १२ कोटी नागरिकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. राज्यातील शासकीय व पालिका रुग्णालयांचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे. शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघेबदल शस्त्रक्रि या व अन्य १२० उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ आजारांवरील उपचाराची सोय असून पंतप्रधान जीवनदायी योजनेत १२०९ आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास ८५ टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र २३ मे रोजी आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार पांढरी शिधापत्रिकाधारकांसह राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा मिळणार आहे. तो योजनेचा लाभार्थी नसला तरी हा लाभ मिळणार आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून ३१ जुलैपर्यंत या नव्या योजनेची मुदत निश्चित केली आहे.राज्यातील त्यातही मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन बहुतेक शासकीय व पालिका रुग्णालयांचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांसाठी आगामी काळात खाटा कमी पडू नयेत व कोरोना नसलेल्या रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावे यासाठी सर्वच नागरिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. महत्त्वाचे शासकीय रुग्णालयात १२० आजारांवर उपचार घेण्यासाठीचे तयार केलेल्या विशेष पॅकेज योजनेचा लाभ आता या योजनेतील अन्य खाजगी रुग्णालयातही घेता येणार आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली असली तरी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन गरज वाटल्यास या योजनेला मुदतवाढ दिली जाणार आहे. असे आरोग्य विभागाने एका शासन निर्णयाद्वारे कळविले आहे.