जिल्ह्यात सोमवारी येणार २५ लाख बारदाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:09+5:30
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते.यंदा शासनाने धानाला १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने धानाला प्रती क्विंटल ५०० बोनस आणि हिवाळी अधिवेशना दरम्यान अतिरिक्त २०० रुपये हमीभाव जाहीर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्यातील ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावर मागील आठ दिवसांपासून बारदान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे धान खरेदी ठप्प होण्याची शक्यता होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने त्याची दखल घेत कलकत्ता येथून २५ लाख बारदाना मागविला. हा बारदाना जिल्ह्यातील सर्व शासकीय केंद्रावर सोमवारी (दि.२०) पोहचणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते.यंदा शासनाने धानाला १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने धानाला प्रती क्विंटल ५०० बोनस आणि हिवाळी अधिवेशना दरम्यान अतिरिक्त २०० रुपये हमीभाव जाहीर केला. धानाला सर्व मिळून २५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत असल्याने आणि मागील वर्षीच्या तुलनेत धानाचे उत्पादन अधिक झाल्याने धान खरेदी केंद्रावर आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १५ लाख क्विंटल आणि आदिवासी विकास महामंडळाने ४ लाख क्विंटल धान खरेदी केला आहे.मात्र ज्या प्रमाणात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची आवक सुरू आहे.त्या तुलनेत खरेदी केंद्रावर बारदान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. शासनाने फेडरेशनला बारदाना उपलब्ध करुन न दिल्याने ही समस्या निर्माण झाली होती. शासनाने कलकत्ता येथील जूट संचालकाकडून बारदाना मागविला आहे. मात्र तो वेळेत पोहचल्याने फेडरेशनची धान खरेदी ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर अनेक शेतकऱ्यांचा धान बारदान्याअभावी खरेदी केंद्रावर पडून होता. अवकाळी पावसाचा या धानाला फटका बसून नुकसान होते. त्यामुळे धान विक्रीसाठी नेणारे शेतकरी संकटात आले होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर त्याची जिल्हाधिकारी आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गांर्भियाने दखल घेत कलकत्ता येथून जूट संचालकाकडून २५ लाख बारदाना तातडीने मागविला. हा बारदाना कलकत्ता येथून रवाना झाला असून सोमवारी तो जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रावर पोहचणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
महामंडळाच्या धानाला ताडपत्र्यांचाच आधार
आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत ४ लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी करण्यात आला आहे. मात्र या धानाला ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था अद्यापही करुन देण्यात आली नाही. त्यामुळे खरेदी केलेला सर्व धान महामंडळाच्या केंद्राबाहेर ताडपत्र्या झाकून तसाच पडला आहे.
अवकाळी पावसाचे संकट कायम
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून शनिवारी सकाळी काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल धानाला फटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
चुकाऱ्यांसाठी ३० कोटींचा निधी
शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला मागील महिनाभरापासून निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांचे १०० कोटी रुपयांचे चुकारे थकले होते. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर शासनाने शुक्रवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. मात्र यानंतरही ७० कोटी रुपयांचे चुकारे शिल्लक आहे. तर धान खरेदी केंद्रावर अद्यापही मोठ्या प्रमाणात धानाची आवक सुरुच आहे. त्यामुळे निधीची पुन्हा गरज आहे. त्यामुळे शासन यावर नेमका काय तोडगा काढते याकडे लक्ष आहे.