पन्नाशी पार कर्मचाऱ्यांची फिल्डवर्कपासून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:14+5:30
पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाची पोलीस विभागात प्रशंसा केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून आता तर शहराच्या वेशीवर कोरोना रूग्ण आले आहेत. यामुळे शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुले तसेच वयस्कांना जास्त असल्याचे सांगीतले जाते. त्यातही सर्वसामान्य माणूस आपल्या घरात राहून स्वत:ला सुरक्षीत ठेऊ शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव त्यात वयस्कांसाठीचा धोका तसेच फिल्डमध्ये काम करताना येणारा शेकडो नागरिकांचा संपर्क बघता पोलीस अधीक्षकांनी येथील वाहतूक नियंत्रण शाखेतील ९ कर्मचाऱ्यांची फिल्डवर्कपासून सुटका करीत त्यांचे पोलीस ठाण्यांमध्ये स्थानांतरण करून कार्यालयीन कामकाजासाठी ठेवले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाची पोलीस विभागात प्रशंसा केली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून आता तर शहराच्या वेशीवर कोरोना रूग्ण आले आहेत. यामुळे शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुले तसेच वयस्कांना जास्त असल्याचे सांगीतले जाते. त्यातही सर्वसामान्य माणूस आपल्या घरात राहून स्वत:ला सुरक्षीत ठेऊ शकतो. मात्र पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ते शक्य नाही.
विशेष म्हणजे, कोरोनामुळे पोलीस खात्यावरील कामाचा ताण अधिकच वाढला असून दिवसरात्री ड्यूटी त्यांना करावी लागत आहे. त्यातही वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत कर्मचाऱ्यांना उन्हा-तान्हातही रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचाऱ्यांचा नागरिकांसोबत सर्वाधिक संपर्क येतो. अशात मात्र या कडक उन्ह व नागरिकांच्या सतत संपर्कात येत असल्याने वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचारी धोक्यात असून त्यातही पन्नाशी पार झालेल्यांना धोकाही जास्त आहे असे. हीच बाब लक्षात घेत येथील वाहतूक नियंत्रण शाखेतील पन्नाशी पार झालेल्या ९ कर्मचाऱ्यांची फिल्डवर्कपासून सुटका करवून देत त्यांचे स्थानांतरण पोलीस ठाण्यांमध्ये कार्यालयीन कामकाजासाठी करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी घेतला.
यासाठी त्यांनी गुरूवारी (दि.२८) तसे आदेश काढले. त्यानुसार, या ९ जणांना वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी शुक्रवारी (दि.२९) विभागातून कार्यमुक्त केले असून या ९ कर्मचाऱ्यांनी आपल्या नवीन स्थळी कार्यभार हाती घेतला आहे.
५ जणांची शहर तर ४ जणांची ग्रामीण ठाण्यात बदली
वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत पन्नाशी गाठलेल्या या कर्मचाºयामध्ये ४ सहायक फौजदार, ४ पोलीस हवालदार व १ पोलीस नायक आहे. यातील ५ जणांची बदली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर ४ जणांची बदली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या ९ कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज करायचे आहे. पोलीस अधीक्षक शिंदे यांच्या या निर्णयातून त्यांचा आपल्या कर्मचाºयांप्रतीचा जिव्हाळा दिसून आला असून यामुळे पोलीस विभागात त्यांच्या या निर्णयाची प्रशंसा केली जात आहे.