आता तरी घरातच रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:27+5:30
अवघ्या जगातच कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची झळ आता देशालाही पोहचू लागली असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना येताच व त्याचे दुष्परिणाम बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) ‘जनता कर्फ्यू’ पुकारला होता. त्याला देशवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र अशातही काही समाजकंटकानी घराबाहेर निघून पंतप्रधानांच्या विनंतीलाही मान दिला नाही. परिणामी रस्त्यावर थोडीफार का असोना मात्र वर्दळ दिसून येत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या पासून आतापर्यंत सुटलेल्या गोंदिया जिल्ह्यातही शुक्रवारी (दि.२७) एक रूग्ण आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. अशातही मात्र नागरिकांना याबाबत गांभीर्य जाणवत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र ही बाब अतीशय गंभीर असल्याने आता तरी घरात रहा असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात आहे.
अवघ्या जगातच कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची झळ आता देशालाही पोहचू लागली असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना येताच व त्याचे दुष्परिणाम बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) ‘जनता कर्फ्यू’ पुकारला होता. त्याला देशवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र अशातही काही समाजकंटकानी घराबाहेर निघून पंतप्रधानांच्या विनंतीलाही मान दिला नाही. परिणामी रस्त्यावर थोडीफार का असोना मात्र वर्दळ दिसून येत होती. स्वत:ला एक दिवस घरात ठेवायला तयार नसलेल्या नागरिकांना चपराक म्हणून कोरोनाचे रूग्ण वाढूच लागले आहे.
याची दखल घेत आता पंतप्रधानांनी अवघ्या देशातच बुधवारपासून (दि.२५) ‘लॉकडाऊन’ करून टाकले आहे. मात्र अशा या समाज विघातक नागरिकांकडून त्याचीही अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसत आहे. सकाळपासूनच थोड्याफार प्रमाणात का असोना नागरिक रस्त्यावर फिरताना दिसतच आहेत.
आतापर्यंत जिल्हावासी एकही रूग्ण न मिळाल्याने स्वत:ला सुखरूप मानत होते. मात्र शुक्रवारी (दि.२७) अचानकच एक रूग्ण आढळून आल्याने सर्वांची धाकधूक वाढली आहे. आता काय करावे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र तरिही कमी का असोना घराबाहेर निघणारे दिसूनच येत आहेत. अशात आता तरी खबरदारी म्हणून आपापल्या घरात रहा असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात आहे.
पोलिसांना सहकार्य करा
आरोग्य व पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सर्वांच्या जीवासाठी झटत आहेत. आपले कुटुंब घरी सोडून ते नागरिकांना सेवा देत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम करीत त्यांचे आवाहन पाळण्याचे सोडून आताही नागरिक विनाकारण रस्त्यावर दिसत आहेत. तुमच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या त्या पोलिसांना सहकार्य करण्याची गरज असून यासाठी जास्त काही नाही तर फक्त आपापल्या घरात राहायचे आहे.