विदर्भात गोंदिया सर्वात थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:12+5:30
अवकाळी पाऊस आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे विदर्भात शीत लहर आली असून यामुळे तापमानात घट झाली आहे.शुक्रवारी गोंदियाचे तापमान ८.२ अंश सेल्सिअसवर आल्याने थंडीत वाढ झाल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना शेकोट्या पेटवून ऊब घेऊन थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात बुधवारी आणि गुरूवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर शुक्रवारी (दि.१०) तापमानात घट झाल्याने हुडहुडी वाढली होती. शुक्रवारी विदर्भात सर्वात कमी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली आहे.त्यामुळे विदर्भात गोंदिया सर्वात थंड होते.
अवकाळी पाऊस आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे विदर्भात शीत लहर आली असून यामुळे तापमानात घट झाली आहे.शुक्रवारी गोंदियाचे तापमान ८.२ अंश सेल्सिअसवर आल्याने थंडीत वाढ झाल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना शेकोट्या पेटवून ऊब घेऊन थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. थंडीत वाढ झाल्याने याचा नागरिकांच्या दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता.थंडीत वाढ झाल्याने स्वेटर विक्रेत्यांच्या दुकानातील गर्दीत वाढ झाली होती. जिल्ह्यात मौसमातील सर्वात कमी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मागील वर्षी २८ डिसेंबर रोजी झाली होती. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली होती. मात्र हवामान खात्याने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यत गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.
बुधवार आणि गुरूवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर गोंदिया महसूल मंडळात ६६ मि.मी.पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टी झाली. अवकाळी पावसामुळे सुध्दा वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील तापमानात घट झाली असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील दोन दिवस पुन्हा जिल्ह्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज या विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुन्हा दोन दिवस जिल्हावासीयांना हुडहुडीपासून सुटका नसल्याचे चित्र आहे.
स्वेटरसह रेनकोट बाहेर
जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. तर दुसरीकडे थंडी देखील वाढ झाली आहे.त्यामुळे जिल्हावासीयांना स्वेटरसह रेनकोट देखील सोबत ठेवण्याची वेळ आली आहे.थंडी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या वातावरण सोशल मीडियावर सुध्दा चांगले जोक तयार केले जात आहे. तर अनेक ज्येष्ठ नागरिक मागील आठ दहा वर्षांत ऐवढी थंडी कधीच पडली नसल्याचे सांगत आहे.
वातावरणातील बदलाचा परिणाम
पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम विदर्भातील दोन तीन जिल्ह्यावर होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यात गोंदियाचा देखील समावेश होता. जंगलाचे कमी होत चालले प्रमाण,जमिनीची धूप, पांरपारिक पिकांची लागवड, प्रदूषणात होत असलेली वाढ यासर्व गोष्टींमुळे हे बदल होत असल्याचे म्हटले आहे.