लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ३० जागांवर विजय संपादन करण्याचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जाहीर केले. पश्चिम बंगालमध्ये मिळालेले घवघवीत यश तसेच आसाम व पुद्दुचेरीमध्ये सत्ता स्थापनेसाठी केलेली आगेकूच याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी येथील मुख्य कार्यालयाजवळ मोठा जल्लोष केला.
भाजप कार्यालयाजवळ झालेल्या विजयोत्सवाच्या कार्यक्रमास व्यासपीठावर बांधकाममंत्री दिगंबर कामत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पशु संवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिव्या राणे, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार रुडॉल्फ फर्नाडिस, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळळ्येंकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यातील जनतेचाही भाजपवर तसेच मोदींवर पूर्णपणे विश्वास असून गोव्यात चौथ्यांदा भाजपचे सरकार सत्तेवर येईल. त्यानंतर २०२९ मध्येही पुन्हा केंद्रात रालोआचे सरकार स्थापन होऊन मोदीजीच पंतप्रधान बनतील.
पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कष्टाला यश : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की,' प. बंगालमधील भाजपने प्राप्त केलेला विजय अद्वितीय आहे. मोदीजी व अमित शाह यांनी त्यासाठी फार कष्ट घेतले. पंधरा दिवसात २४ रॅली काढल्या. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आता कमळ फुलले आहे. मोदींच्या 'विकसित भारत २०४७' या विजयामुळे बळ मिळाले आहे. प. बंगालात भाजप सरकार यापुढे घुसखोरांना थारा देणार नाही. त्यांना बाहेर हाकलू. देशाच्या नागरिकांनाच येथे राहण्याचा अधिकार आहे. या राज्याला देशाकडे जोडून ठेवण्याचे काम यापूर्वी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केले होते. आज हेच काम मोदी करत आहेत.
सतीश धोंड यांची 'रणनीती' यशस्वी
पश्चिम बंगालमधील अभूतपूर्व यशानंतर सतीश धोंड यांचे नाव चर्चेत आले आहे. बंगालमध्ये आसनसोल येथे ते भाजपचे संयुक्त सरचिटणीस (आयोजन) या महत्त्वाच्या पदावर काम करत होते. बंगालमधील यशानंतर गोव्यातही पक्ष वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा ऐतिहासिक क्षण : दामू नाईक
यावेळी दामू नाईक म्हणाले, बंगालमधील विजय हा ऐतिहासिक क्षण आहे, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. १९८२ साली तेथे भाजपला केवळ ०.५८ टक्के मते मिळाली. परंतु आम्ही हार मानली नाही. सातत्याने काम करत राहिलो. पाच वर्षांपूर्वी आम्हाला ७७ जागा मिळाल्या. तृणमूलने भाजप कार्यकर्त्यांवर अत्याचार चालवले होते. भाजपला येथे संघर्षमय प्रवास करावा लागला व आज हे यश मिळाले आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना द्यावे लागेल.
'झालमुरी' वाटून आनंदोत्सव
मुख्यमंत्री सावंत व दामू नाईक यांना मोठा पुष्पहार घालण्यात आला. एकमेकांना झालमुरी वाढून आनंदोत्सव साजरा केला व त्यानंतर शहरात मोटरसायकल रॅलीही काढली. मुख्यमंत्री सावंत, दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हे दुचाकींवर मागे बसून रॅलीमध्ये सहभागी झाले. ढोल ताशांच्या गजरात घोषणा देण्यात आल्या.
Web Summary : Goa BJP aims to win 30 seats in 2027 elections, announced CM Sawant and Naik. Celebrations followed West Bengal's success and advances in Assam. The party anticipates a fourth term in Goa and Modi's return as Prime Minister in 2029.
Web Summary : गोवा भाजपा का लक्ष्य 2027 के चुनावों में 30 सीटें जीतना है, मुख्यमंत्री सावंत और नाइक ने घोषणा की। पश्चिम बंगाल की सफलता और असम में प्रगति के बाद जश्न मनाया गया। पार्टी को गोवा में चौथे कार्यकाल और 2029 में मोदी की प्रधानमंत्री के रूप में वापसी की उम्मीद है।