दोन महिने पुरेल एवढा जलसाठा: मंत्री सुभाष शिरोडकर, पाण्याच्या पातळीची केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:24 IST2026-05-01T12:23:57+5:302026-05-01T12:24:29+5:30
राज्यातील धरणांमधील सद्यस्थिती

दोन महिने पुरेल एवढा जलसाठा: मंत्री सुभाष शिरोडकर, पाण्याच्या पातळीची केली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व धरणांमध्ये यंदा पुढील दीड ते दोन महिने पुरले एवढा पाणीसाठा आहे. लोकांना पाण्यासाठी घाबरण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे मे एप्रिल महिन्यात कुठेच पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी गुरुवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री शिरोडकर म्हणाले, प्रत्येक वर्षी एप्रिल मे महिन्यात धरणातील पाण्याची पातळी घटत असते. त्यामुळे पाण्याची समस्या उद्भवत असते. तसेच अनेक ठिकाणी पाणी नसल्याच्या समस्या समोर येत असतात. पण, या वर्षी अशा प्रकारे लोकांमध्ये भीती पसरू नये, यासाठी आम्ही सर्व धरणांतील पाण्याच्या पातळीची पाहणी केली आहे. या वर्षी जवळपास ३५ टक्के पाणीसाठा राज्यातील विविध धरणांमध्ये आहे, तो गेल्या वर्षी ३२ टक्के होता.
मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीच्या १ अहवालानुसार साळावली धरणातील पाणीसाठा ४०.४५ टक्के असून तो पुढील दोन महिने पुरेसा आहे. तिळारी धरणात ४१.०२ टक्के साठा आहे. आमठाणे धरण ४४.४४ टक्के तर चापोली धरण ४८.७४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
दरम्यान, अंजुणे धरणातील साठा घसरून २३.८३ टक्क्यांवर आला आहे, तरीही दोन महिने पुरेल एवढा हा साठा आहे. पंचवाडी धरणातील साठा काहीसा वाढून ३५.०७टक्क्यांवर गेला आहे, तर गावणे धरणात ४८.११ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.
राज्यातील पाहता काही धरणांमध्ये समाधानकारक साठा असला पाणीसाठ्याची स्थिती तरी काही ठिकाणी घट दिसून येत आहे. आगामी काळात पाण्याचा योग्य वापर व व्यवस्थापन केले जाणार आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.
अंजुणे धरणाचा गाळ उपसणार
अंजुणे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून तो गाळ आता काढला जाणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे.
अंजुणे धरणातील गाळ काढल्यावर या धरणातील पाण्याच्या साठ्याची क्षमता आणखी वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात या परिसरात पाण्याची समस्या सुटणार आहे.
डिचोली, साखळी, मये भागात मर्यादित पाणी पुरवठा
मये मतदारसंघातील कोडाळ कारापूर गावातील एमएमडीआय पाइपलाइनचे तातडीने स्थलांतर करण्याचे असल्याने ५ आणि ६ मे रोजी संपूर्ण डिचोली, साखळी, मये मतदारसंघातील कांही भागात मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा खात्याने सांगितले आहे.
साळावली जलशुद्धीकरण प्रकल्प बंद
दक्षिण गोव्यातील अनेक भागात ५ ते ७ मे दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असून याबाबत प्रशासनाने सूचना जारी केली आहे. साळावली येथील १६० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
५ व ६ मे रोजी १२०० मिमी साळावली पीएससी पाइपलाइन दुरुस्तीसाठी प्रकल्प पूर्णपणे बंद राहणार असल्याने केपे, कुंकळ्ळी, कुडचडे, मडगाव, दक्षिण गोव्याचा किनारी पट्टा, फातोर्डा, नुवे, कुठ्ठाळि, दाबोळी, वास्को आणि मुरगाव मतदारसंघांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
तसेच ७ मे रोजीही पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत होणार असल्यामुळे मर्यादित स्वरूपातच उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, १०० एमएलडी क्षमतेचा साळावली जलशुद्धीकरण प्रकल्प नियमित सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवावा व या काळात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.