जागावाटप नंतर ठरेल, आमचे सर्व मतदारसंघात काम सुरू; दामू नाईक यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:46 IST2026-05-12T12:46:19+5:302026-05-12T12:46:40+5:30
विधानसभा निवडणूक केव्हाही जाहीर झाल्या तरी आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहोत.

जागावाटप नंतर ठरेल, आमचे सर्व मतदारसंघात काम सुरू; दामू नाईक यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभा निवडणूक केव्हाही जाहीर झाल्या तरी आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहोत. जागा वाटप व इतर गोष्टी नंतर ठरतील. पण सध्या आम्ही सर्व ४० मतदारसंघात काम सुरू केले आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, 'जागा वाटप, युती आणि इतर राजकीय समीकरणांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. मात्र, सध्या संघटन बळकट करणे आणि प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवणे हे पक्षाचे मुख्य लक्ष्य आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघात भाजपची ताकद वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.'
मगोविषयी विचारलेल्या प्रश्नाबाबत दामू म्हणाले की, 'मगो हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि ते त्यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेतात. त्यांच्या अंतर्गत राजकीय भूमिकांबाबत आम्हाला अधिक भाष्य करायचे नाही. भाजपची ध्येय्य धोरणे आणि जबाबदाऱ्या वेगळी आहेत. मगोचा सरकारमध्ये युती असल्याने ते विषय त्या पातळीवर हाताळले जातील. प्रियोळ मतदारसंघात भाजपचा आमदार असल्यामुळे त्या जागेवर आमचा दावा कायम आहे.