भू-बळकाव: ईडीकडून १,२६८ कोटींच्या १९ मालमत्ता जप्त; हणजूणसह आसगाव, उसकईत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:18 IST2025-12-02T16:18:13+5:302025-12-02T16:18:13+5:30
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

भू-बळकाव: ईडीकडून १,२६८ कोटींच्या १९ मालमत्ता जप्त; हणजूणसह आसगाव, उसकईत कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील बहुचर्चित जमिनी बळकाव प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल १,२६८ कोटी ६३ लाख रुपये किमतीच्या १९ स्थावर मालमत्तांवर तात्पुरती जप्ती घातली आहे.
हणजूण, आसगाव आणि उसकई या भागांमध्ये पाच लाख चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या या मालमत्ता आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
ही जमीन बनावट, खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून समोर आलेल्या उद्योगपती शिवशंकर मयेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रमाणपत्रे, ताबापत्रे, नकाशे, खरेदी-विक्री आणि भेटनामा अशा विविध प्रकारची कागदपत्रे खोटी बनवून अनेक मालमत्ता गैरमार्गाने आपल्या ताब्यात घेतल्याचे ईडीच्या तपासात आढळले आहे. अशा मालमत्ता शोधून त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वीही केली होती कारवाई
या प्रकरणात ईडीने यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून एप्रिल २०२५ मध्ये २४ मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. २०२३ मध्येही ३१ मालमत्ता जप्त झाल्या होत्या. या सर्व कारवायांच्या आधारे या घोटाळ्याचे एकूण मूल्य तब्बल १,२०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे.
आणखी काही खुलासे होणार
ईडीने शिवशंकर मयेकरला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जप्त केलेल्या या मालमत्तांचा वापर पैसे वळवण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी केल्याचा ईडीचा दावा आहे. गोव्यातील जमीन हडप प्रकरणात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून पुढील काही दिवसांत आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.