नद्यांमध्ये कचरा टाकू नका!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:35 IST2026-05-06T11:34:36+5:302026-05-06T11:35:26+5:30
गिरी येथील तार नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची केली पाहणी; काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश; १ हजार हेक्टर शेतीला दिलासा

नद्यांमध्ये कचरा टाकू नका!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सरकारने राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार केला आहे. मात्र, त्यासाठी लोकांचीही साथ हवी आहे. आज नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकून त्या प्रदूषित केल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नद्यांत कचरा टाकणे तात्काळ थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
गिरी परिसरात तार नदीवर सुरू असलेल्या पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पाहणी प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता सालेलकर तसेच स्थानिक पंचायत सदस्य उपस्थित होते. प्रकल्पाच्या कामावर सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
गिरी परिसरातील वारंवार पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या सुमारे १ हजार हेक्टर शेतीला दिलासा देण्यासाठी सुरू असलेल्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देत हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून शेतीचे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर ४६ कोटी रुपये खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री स्वतः होडीतून कामाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली. या प्रकल्पांतर्गत बस्तोडा येथून उगम पावणारी आणि सुमारे ८ किलोमीटर प्रवास करून तार नदीला मिळणारी ही नदी स्वच्छ करण्यात येत आहे. नदीतील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून आवश्यक ठिकाणी नदीची रुंदी वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर बांध बांधणीचे कामही हाती घेण्यात आले आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा शेती आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सुमारे ४६ कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पांतर्गत नदीतील गाळ काढणे, नदीची रुंदी वाढवणे आणि बांधबांधणी करणे ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. बस्तोडा ते तार नदीपर्यंतचा सुमारे ८ किलोमीटरचा पट्टा विकसित केला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले.
या कामामुळे पावसाळ्यातील पाण्याचा निचरा सुरळीत होणार असून पाणी साचण्याची समस्या कमी होणार आहे. परिणामी, शेतीयोग्य जमीन पुन्हा वापरात येऊन उत्पादनक्षमता वाढण्याची शक्यता आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेती पुन्हा ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना वर्षाला दोन पिके घेणे शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यंदाच्या पावसाळी हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कृषी खात्याकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना नदीत कचरा टाकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर टाळावा, असे आवाहन केले. भविष्यात हा परिसर शेतीबरोबरच निसर्ग पर्यटनासाठीही आकर्षण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
१०० बंधारे उभारण्याचे काम सुरू : मंत्री शिरोडकर
जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी राज्यात अशाच स्वरूपाचे अनेक जलसंधारण प्रकल्प राबवले जात असल्याची माहिती दिली. मागील दोन वर्षात सुमारे १०० बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्याचा मोठा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. योग्य मशागत केल्यास या जमिनीतून दरवर्षी सुमारे २० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. केदार नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.