कावड अन् पायपीट केव्हा संपणार? रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींना वाचवतानाचे विदारक वास्तव समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:37 IST2026-05-02T16:35:29+5:302026-05-02T16:37:58+5:30
Gadchiroli : भामरागड तालुक्यातील दुर्गम दर्भा परिसरात रानडुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून दोन दिवसांत दोन जणांना जखमी केले. मात्र, या भीषण घटनेने प्रशासकीय सुविधांचे वाभाडे काढले असून, जंगलात रस्ता नसल्याने जखमीला चक्क कावड करुन एक किलोमीटरची पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले.

When will the fighting and the fighting end? The shocking reality is on the horizon to save those injured in a wild boar attack
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील दुर्गम दर्भा परिसरात रानडुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून दोन दिवसांत दोन जणांना जखमी केले. मात्र, या भीषण घटनेने प्रशासकीय सुविधांचे वाभाडे काढले असून, जंगलात रस्ता नसल्याने जखमीला चक्क कावड करुन एक किलोमीटरची पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. ही हृदयद्रावक दृश्ये दुर्गम भागातील संघर्षाची साक्ष देत आहेत.
पहिली घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास घडली. दर्भा येथील मुल्ला चैतु पिडसे (५०) हे तेंदूपत्ता हंगाम जवळ आल्याने दोरी आणण्यासाठी धोडराजच्या जंगलात गेले होते. दरम्यान, एका रानडुकराने त्यांच्यावर झडप घालून पोटावर जबर हल्ला केला सोबतच्या लोकांनी आरडाओरडा केल्याने डुक्कर पळाले, पण मुल्ला गंभीर जखमी झाले होते.
जंगलात रुग्णवाहिका जाणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी तात्काळ बांबूची कावड तयार केली. गंभीर जखमी मुल्ल यांना त्या कावडीत बांधून सुमारे एक किलोमीटरची डोंगरदऱ्यातून पायपीट केली. मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
दुसऱ्या दिवशी महिलेवर हल्ला
ही घटना ताजी असतानाच १ मे रोजी सकाळी १०:३० वाजता याच गावातील मादी टुगे पुंगाटी (४५) या महिलेवर रानडुकराने हल्ला केला. यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भरपाई देण्याची मागणी
तेंदूपत्ता संकलन सुरू होण्यापूर्वीच वन्य प्राण्यांचे हल्ले वाढल्याने मजुरांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून जखमींना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.