-तर सात मीटरच रस्ता उरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:48+5:30
देसाईगंज येथील विर्शी तुकूम सर्वे नं. १७८/४ च्या लेआऊटमध्ये नियोजन प्राधिकरण नगरविकास विभाग यांच्या वतीने १६ आॅक्टोबर २००१ रोजी नऊ मीटरचा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला. परंतु या रस्त्याच्या दुतर्फा लगतच्या रहिवाशांनी घर बांधकाम करताना रस्त्यावरील जागेवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले. रस्त्याची नियोजित जागा अनधिकृतरित्या कब्जात घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शहराच्या कस्तुरबा वॉर्डातील सिद्धांत नगरात नालीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करताना अतिक्रमण हटवून रस्त्यासाठी नऊ मीटर जागा सोडणे आवश्यक होते. परंतु याकडे दुर्लक्ष करून सिमेंट काँक्रिट नालीचे बांधकाम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले. रस्त्यासाठी आता केवळ सात मीटरच जागा उरत आहे. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या लोकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
देसाईगंज येथील विर्शी तुकूम सर्वे नं. १७८/४ च्या लेआऊटमध्ये नियोजन प्राधिकरण नगरविकास विभाग यांच्या वतीने १६ आॅक्टोबर २००१ रोजी नऊ मीटरचा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला. परंतु या रस्त्याच्या दुतर्फा लगतच्या रहिवाशांनी घर बांधकाम करताना रस्त्यावरील जागेवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले. रस्त्याची नियोजित जागा अनधिकृतरित्या कब्जात घेतली. तरीसुद्धा काहीच कारवाई झाली नाही. सध्या नगर परिषदेच्या वतीने रस्त्याच्या बाजूने नाली बांधकामाचे काम सुरू आहे. नाली बांधकाम करताना नऊ मीटरच्या रस्त्यावर असलेले अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तक्रार मुख्याधिकाऱ्यांना दोनवेळा देण्यात आली. परंतु प्रशासनाने रस्त्यावरील व ले-आऊटमधील कोणतेही अतिक्रमण हटविले नाही. उपलब्ध सात मीटर रस्त्याच्या बाजूने नाली बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे या मार्गावर नऊ ऐवजी सात मीटरचाच रस्ता उरणार आहे. सार्वजनिक रहदारीच्या दृष्टीने येथील अतिक्रमण हटवून नऊ मीटरचा रस्ता उपलब्ध करावा, अशी मागणी एम. आर. बोटकावार, ए. जी. रामटेके, एम. एच. तिरपुडे, के. पी. सहारे, बी. टी. ढोमणे, आर. एन. गभणे, एच. एस. लाडे, डी. लोनबले यांनी तक्रारीद्वारे केली.
पांदण रस्ता म्हणून नोंद
२००१ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरविकास विभागाने कस्तुरबा वॉर्डातील हा रस्ता शेतीकडे जाणारा पांदण रस्ता म्हणून प्रस्तावित केले होते. परंतु कालांतराने या भागात लोकवस्ती वाढली. अनेक ले-आऊटधारकांनी अतिक्रमण केल्याने नऊ मीटरचा रस्ता केवळ सात मीटर रूंद उरला आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ले-आऊटधारकांचे फावले व रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणही फोफावले.