विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी बसवेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:00 AM2021-10-11T05:00:00+5:302021-10-11T05:00:42+5:30

गडचिराेली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित  व विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. येथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टाेबरपासून भरविले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली आहे. एकाच ठिकाणी बसण्यासाठी विद्यार्थ्यांना कंटाळा येत असल्याचे विद्यार्थी व शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर दिसून आले आहे.

Students should not be seated in one place | विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी बसवेना

विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी बसवेना

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या आदेशान्वये प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. प्रत्यक्ष वर्ग बंद राहिल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू हाेते. तब्बल दीड वर्षानंतर काेराेनाचा प्रादुर्भाव आटाेक्यात आल्यानंतर आता ४ ऑक्टाेबरपासून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यात येत आहेत. शाळा बंदमुळे शिक्षणात सातत्य न राहिल्याने विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
गडचिराेली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित  व विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. येथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टाेबरपासून भरविले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली आहे. एकाच ठिकाणी बसण्यासाठी विद्यार्थ्यांना कंटाळा येत असल्याचे विद्यार्थी व शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर दिसून आले आहे.

एकाच ठिकाणी बसायचे कसे
प्रत्यक्ष शाळेत नियमित गेल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी व शिस्त लागते. मात्र दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने सतत घरी राहून विद्यार्थी बेशिस्त झाले आहेत. प्रत्यक्ष वर्गात एकाच ठिकाणी तासन् तास बसण्याकरिता विद्यार्थ्यांना कंटाळा येत आहे. 

लिहिण्याचीही अडचण
माेबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने मागील व गतवर्षीच्या सत्रात तसेच आत्तापर्यंत शिक्षण सुरू हाेते. ऑनलाईन शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना जादा लेखन कार्य करावे लागत नव्हते. परिणामी विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली. आता प्रत्यक्ष वर्गात लिहिण्याचा विद्यार्थी कंटाळा करीत आहेत. 

विद्यार्थ्यांची सवय तुटली

दीड वर्षापासून शाळांचे प्रत्यक्ष वर्ग बंद आहेत. यादरम्यानच्या कालावधीत पालकांकडून विद्यार्थ्यांसाठी फारसे प्रयत्न झाले नाही. परिणामी घरी राहून विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली. काही विद्यार्थ्यांचे अक्षर बिघडले आहेत. 
- विलास मगरे,
माध्यमिक शिक्षक.

दीड वर्षांपूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांना पाढे पाठ हाेते. आता त्यांना पाढ्यांचा पूर्णत: विसर पडला आहे. वजाबाकी, बेरीज व इतर आकडेमाेड करण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच वेळ लागत आहे. व्यवस्थित वाचताही येत नाही. 
- हिमांशू गेडाम, 
प्राथमिक शिक्षक

पाठ दुखतेय

वर्गात बसण्याची सवय तुटल्यामुळे आता पाठीत दुखत आहे. दिवसभर बसण्यासाठी त्रास हाेत आहे. माझे वर्गमित्रसुद्धा खेळण्यावर भर देत आहेत. उशीरा शाळा सुरू झाल्याने अभ्यासक्रमात कपात हाेणार आहे.
- विजय करंगामी, विद्यार्थी.

आम्हाला ऑनलाईन शिक्षणाची सवय जडली. आता प्रत्यक्ष वर्गात बसून ज्ञान, आकलन करण्यासाठी थाेडा त्रास हाेत आहे. वर्गात बसून ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रक्रियेत रूळण्याकरिता आणखी काही दिवस लागतील. 
- श्वेता मेश्राम, विद्यार्थिनी.

आव्हाने काय?
प्रत्यक्ष शिक्षणात माेठा खंड पडल्याने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कमी झाली आहे. काही विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. या सर्व बाबीमुळे शिक्षकांना एकाच गाेष्ट वारंवार पटवून द्यावी लागत आहे. 

यावर उपाय काय?
विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे शिक्षणात अग्रेसर करण्यासाठी दरराेज लेखन कार्याची सवय लावणे, अधिकाधिक गृहपाठ, आकलन व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना शाळेत नियमित अध्ययनासाठी मार्गदर्शन करावे लागणार आहे.

 

Web Title: Students should not be seated in one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.