राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 06:18 IST2026-05-01T06:17:54+5:302026-05-01T06:18:23+5:30
१५ मेपर्यंत ऑनलाइन माहिती भरण्याची संधी, जनगणना प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
मुंबई - राज्यात १ मेपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, यावेळी प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा टप्पा ऐच्छिक असणार असून १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे.
राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. देशातील ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असून नागरिकांच्या सहभागाला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जनगणना प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
स्व-गणना कशी कराल?
संकेतस्थळ : se.census.gov.in/
एका कुटुंबासाठी एकच अर्ज
एकूण ३३ प्रश्नांची माहिती भरावी लागेल. ती अचूक भरा.
कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही
माहिती पूर्ण भरल्यावर तुम्हाला ११ अंकी युनिक आयडी मिळेल.
हा आयडी पुढील पडताळणीसाठी जतन करून ठेवणे आवश्यक
‘घरगणना’ कधी?
१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना अधिकारी घरोघरी जाऊन ‘घरगणना’ करतील. स्व-गणना केली आहे, त्यांच्या माहितीची पडताळणी केली जाईल. यावेळी युनिक आयडी दाखवणे आवश्यक असेल. तर स्व-गणना न केलेल्या नागरिकांची माहिती अधिकारी स्वतः भरून घेतील.
घ्या ही काळजी
अधिकृत संकेतस्थळावरच माहिती भरा
संशयास्पद लिंक किंवा संदेश टाळा
एसएमएस/ई-मेलचा स्रोत तपासा
वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करू नका
२.६४ लाख कर्मचारी तैनात
या जनगणनेसाठी राज्यभरात सुमारे २.६४ लाख क्षेत्रीय कर्मचारी, जनगणना अधिकारी आणि पर्यवेक्षक तैनात करण्यात येणार असून १० टक्के राखीव कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत.